AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळणार, बोंबलून प्रश्न मांडू नका, दमडी न देणाऱ्या केंद्राकडे शिमगा करा : मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना जो शब्द मी दिलेला आहे. तो माझा आणि शेतकऱ्यांमधला आहे. तो मी पाळणार आहे. पण आम्ही  तुम्हाला काय करायला लावलं असा आव विरोधीपक्षाने आणायचा प्रयत्न करु नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले

मी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळणार, बोंबलून प्रश्न मांडू नका, दमडी न देणाऱ्या केंद्राकडे शिमगा करा : मुख्यमंत्री
| Updated on: Dec 17, 2019 | 3:01 PM
Share

नागपूर :  विरोधकांच्या गदारोळानंतर दुसऱ्या दिवशीही विधानसभेचं कामकाज तहकूब झालं. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजाराची मदत दिली जात नाही, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. सभागृहात आज प्रचंड राडा झाला. या राड्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर हल्ला चढवला. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा शब्द देऊन आम्ही सत्तेवर आलो आहे, मी दिलेला शब्द पाळणार असं उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray on Farm Loan, BJP)

शेतकऱ्यांना जो शब्द मी दिलेला आहे. तो माझा आणि शेतकऱ्यांमधला आहे. तो मी पाळणार आहे. पण आम्ही  तुम्हाला काय करायला लावलं असा आव विरोधीपक्षाने आणायचा प्रयत्न करु नये. तुम्हाला जर प्रश्न मांडायचे असतील तर त्याला एक पद्धत आहे. उगाच बोंबलून प्रश्न मांडता येत नाहीत. आमचं उत्तर न ऐकता बोंबलत बसलात तर जनतेसमोर तुमचा कांगावा उघड होतो आहे. लोकांसमोर तुमचंच बिंग फुटतंय. म्हणून माझी आताच्या विरोधी पक्षांना आणि पूर्वीच्या मित्रपक्षांना विनंती आहे की योग्य मार्गे भूमिका मांडा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकारचे पहिले अधिवेशन आहे. यापूर्वी मुंबईत जे अधिवेशन झाले त्यावेळी काय घडले हे तुम्हा सर्वांना महित आहे. काल आज घडलेल्या घटनाही जगासमोर गेल्या आहेत. प्रथम मुख्यमंत्री म्हणून माझं आवाहन आहे की सभागृहाला मोठ्या परंपरेचा वारसा लाभलेला आहे. हे वैभव आहे. त्याला काळीमा लागेल असे वर्तन कोणीही करु नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला.

व्यथा, वेदना मांडा, त्यावर उत्तर घ्या, पण जणू काही आपण एकमेव आहोत आणि समोर सत्ताधाऱ्यांना काहीही पडलेले नाही असे वर्तन निंदाजनक आहे. सभागृहात शेतकऱ्यांबद्दल जो प्रश्न उचलला आहे, त्याबद्दल मी गेली 25 वर्षे मी स्वत: रस्त्यावर उतरलो आहे. पंतप्रधान पीक विमा घोटाळा, शेतकरी सन्मान योजनेतील अपुरी मदत, शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत किंवा कर्जमुक्ती असेल, हे वचन देऊन आम्ही सत्तेवर आलो आहेत. वचन मोडलं तर आम्ही कसे वागतो हे लोकांना माहित आहे. त्यामुळे दिलेले वचनं, दिलेला शब्द पाळणारी आम्ही लोक आहोत. याची खात्री त्यांना आता पटली आहे. जणू आपण हे करण्यासाठी सरकारला भाग पाडलं असा अविर्भाव आणला जात आहे. हे लोकांना कळतं आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

‘जे सामना बघत नव्हेत, ते मोठा करुन दाखवत होते’

आज आणखी एक आश्चर्य म्हणजे जे ‘सामना’ बघत नाही, वाचत नाही, असे म्हणणाऱ्यांना स्वत:च सामना मोठा करुन दाखवावा लागला. याला म्हणतात हा नियतीचा खेळ आहे. कालाय तस्मै नम:, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लगावला.

‘सामना’ आधीच वाचला असता तर यांच्यावर ही वेळ आली नसती. तेव्हा सामनाला आणि शिवसेनेला विरोधात गिनती करत होते. मात्र आता त्याच विरोधकांच्या हातात सामना आला आहे. त्यामुळे सामना हा सर्वसामान्यांचे हत्यार आहे. तेव्हा आम्ही जे बोलत होतो, तो सर्वसामन्यांचा आवाज होता. जर तुम्ही तो लक्षात घेतला असता किंवा वाचला असता किंवा चोरून वाचत होतात तो उघडपणे वाचला असतात तर आज हा सामना करायची तुम्हाला वेळ आली नसती, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्याच्या अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना किती मदत केली गेली याची आकडेवारी दिली आहे. कोल्हापूर पूर – राज्य सरकारने केंद्राकडे 7 हजार कोटी मागितले आहेत. अवकाळी पावसासाठी केंद्राकडे 7 हजार कोटी मागितले आहेत. जे शेतकऱ्यांसाठी आज सरकारकडे गळा काढत आहेत, त्यांनी जरा तिकडे (केंद्राकडे) जाऊन गळा मोकळा करावा, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला.

केंद्राकडून दमडी नाही, शिमगा करायचा असेल तर केंद्र सरकारच्या नावे करा

जे इथे आदळाआपट करतात. त्यांचेच सरकार केंद्रामध्ये आहे. त्यांचेच नेते पंतप्रधान आहेत. जे शेतकऱ्यांसाठी आज सरकारकडे गळा काढत आहेत, त्यांनी जरा तिकडे जाऊन गळा मोकळा केला पाहिजे, गळा मोकळा करणाऱ्यांना गोळ्या मी देतो.  पण तिथे केंद्राकडून राज्याकडे येणारी मदत येणे गरजेचे आहे, तो एक पैसाही आलेली नाही. तरी सुद्धा महाराष्ट्र सरकार हे हाताची घडी घालून बसलेले नाही.  त्यामुळे सरकारकडून 6500 कोटीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पण केंद्राकडून राज्याला जे 15 हजार कोटी परतावा बाकी आहे. ते देत नव्हते. त्या रकमेची मागणी केल्यानंतर सरकार हलू लागले आहे. साडेचार हजारकोटीचा परतावा जीएसटीचा आला. त्यामुळे असे जर सरकर चालायला लागले. तर इथे ठणाणा करुन इथे बोंबाबोंब करुन उपयोग नाही.  शिमगा करायचा असेल तर केंद्र सरकारच्या नावे करावा राज्या सरकारच्या नावाने करु नका, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

देशात अस्वस्थतेचे अशांततेचे वातावरण निर्माण केलं जातंय. मी हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे. दिल्लीत घुसून गोळीबार केला. त्यामुळे जालियनवाला बागेचे दिवस परत आले का? तसेच वातावरण परत निर्माण केले जात आहे का? ज्या राज्यात युवक जिथे बिथरतो तो देश स्थिर राहू शकत नाही. केंद्र सरकारला सांगतो आहे की युवकांना बिथरवू नका. युवक आपला भावी आधारस्तंभ आहे. शक्ती आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray on Farm Loan, BJP)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.