नांदेडमध्ये दोन विमाने आली… कोण कसे गेले दिल्लीला? ऑपरेशन टायगरची इन्साईड स्टोरी समोर
राज्यात ठाकरे गटात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. सहा खासदार दिल्लीला रवाना झाले असून, हे 'ऑपरेशन टायगर' समोर आले आहे. नांदेडहून खासगी विमानाने हे खासदार दिल्लीत एकनाथ शिंदेंना भेटणार आहेत. लोकसभा अध्यक्षांना पत्र देऊन वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे.

राज्यात पुन्हा एकदा सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. ठाकरे गटात हा भूकंप होणार आहे. ठाकरेंचे सहा खासदार फुटणार असल्याची चर्चा आहे. आईबाबांपासून साईबाबांची शपथ घेणारे हे खासदार अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीत पोहोचत आहेत. त्यामुळे आज रात्रभरात दिल्लीत मोठ्या घडामोडी घडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. हे सहाही खासदार दिल्लीला जाण्याचं आधीच ठरल्याचंही समोर आलं आहे. आज दिवसभरात झालेल्या घटनांवरून ऑपरेशन टायगरची इन्साईड स्टोरीच समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीला जाण्यासाठी नांदेडमध्ये आज संध्याकाळी दोन विमाने आली होती. एक विमान दिल्लीवरून आलं होतं. दुसरं विमान मुंबईवरून आलं होतं. हे दोन्ही खाससगी विमान होते. या विमानांमध्ये 8 ते 10 जण होते असं सांगितलं जातं. खासदार नागेश पाटील आष्टीकर हे दिल्लीवरून नांदेडला आले होते. निरोप मिळताच परत हादगाववरून ते बायरोड हैद्राबादला गेले. तिथून विमानाने दिल्लीला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिल्लीच्या विमानात कोण?
तर, दिल्लीला जाणाऱ्या विमानात संजय जाधव, संजय देशमुख आणि भाऊसाहेब वाकचौरे आदी खासदार होते, असं सांगितलं जात आहे. हे सहाही खासदार आज रात्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीतच भेटणार आहेत. दिल्लीत या सहा खासदारांसोबत शिंदे यांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढची रणनीती ठरवली जाणार आहे. त्यानंतर उद्या सकाळी लोकसभा अध्यक्षांना हे खासदार भेटतील आणि वेगळा गट स्थापन करण्याचं पत्र देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
हे खासदार फुटणार?
परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब बाकचौरे आणि खासदार राजाभाऊ वाजे आदी खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं सांगितलं जात आहे.
आईबाबांपासून साईबाबांची शपथ
दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला नऊही खासदार उपस्थित होते, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. काही खासदार ऑनलाईन उपस्थित होते, असं ते म्हणाले. तसेच या खासदारांनी तुळजाभवानी ते आईबाबांपासून साईबाबांपर्यंतची शपथ घेऊन उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं, असं राऊत म्हणाले होते. मात्र, आज येत असलेल्या बातम्यांवरून आणाभाका घेणारे हेच खासदार आता ठाकरेंना सोडणार असल्याचं सांगितलं जात आहे.