राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा, खर्गे म्हणतात…

अनिश बेंद्रे

|

Updated on: Dec 28, 2019 | 10:42 AM

मल्लिकार्जुन खर्गे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे

राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा, खर्गे म्हणतात...
Follow us

मुंबई : विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि विद्यमान भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील ‘यूटर्न’ घेऊन पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. परंतु काँग्रेस सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी विखेंशी भेटीच्या चर्चा धुडकावून लावल्या (Mallikarjun Kharge on Radhakrishna Vikhe) आहेत. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पुत्रप्रेमापोटी विखेंनी वेगळी राजकीय वाट धरली होती.

नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मल्लिकार्जुन खर्गे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचं वृत्त एका दैनिकानं दिलं आहे. त्यानंतर विखे पाटील माघारी फिरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं.

दरम्यान, मला कोणीही भेटलेलं नाही. माझी कुणाशी चर्चा झाली नाही. मला याबाबत काही माहिती नाही, असं उत्तर मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिलं.

काँग्रेस ते भाजप, विखेंचा प्रवास

राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगरमधून भाजपच्या तिकीटावर विधानसभेवर निवडून आले आहेत. परंतु विखेंनी पाडापाडी केल्याचा आरोप माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे यांच्यासह स्थानिक नेत्यांनी केला होता. त्यानंतर भाजपने या प्रकरणाची शहानिशा लावण्यासाठी मुंबईत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक बोलावली.

बैठकीत दोन्ही बाजूंकडून समाधानकारक चर्चा झाल्याची प्रतिक्रिया देण्यात आली. परंतु विजय पुराणिक यांच्या अध्यक्षतेत स्थापन झालेली समिती विखेंवरील पाडापाडीच्या आरोपांची चौकशी करणार आहे. यामध्ये तथ्य आढळल्यास पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत मिळत आहेत.

पक्षाच्या निर्णयाने समाधान, समितीच्या अहवालानंतर पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई : राम शिंदे

फडणवीस सरकारच्या काळात भाजपवासी झालेल्या विखेंना तीन महिने मंत्रिपद अनुभवण्याची संधी मिळाली होती. पुन्हा फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप सरकार स्थापन करेल, असा गाढ विश्वास असल्यामुळे विखे पुन्हा मंत्रिपद मिळण्याच्या धुंदीत होते. परंतु आता, भाजपची सत्ता गेल्यावर सत्ताधारी झालेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश करण्याच्या हालचाली विखेंनी सुरु केल्याचं बोललं जातं.

जुलै महिन्यात तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक जण संपर्कात असल्याचा दावा केला होता. मात्र हा संपर्क विखेंनी परतीचे दोर शाबूत राखण्यासाठी ठेवला होता का (Mallikarjun Kharge on Radhakrishna Vikhe), असं आता विचारलं जात आहे.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI