मनोज जरांगेंचा सरकारला टेन्शन देणारा आणखी एक इशारा; म्हणाले, माझ्या जवळच्या…
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 16वा दिवस आहे. त्यांनी मराठा बांधवांना संबोधित करताना सरकारवर टीका केली आहे. त्यांनी थेट सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. ते काय म्हणाले वाचा...

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज 16वा दिवस आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ते अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. 15 सप्टेंबरला त्यांचा मोर्चा मुंबईकडे वळणार आहे. त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील मराठा बांधवांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, तुम्ही माझ्या जवळच्या सहकाऱ्याला त्रास देणार तेही आंदोलन काळात. हे संपूर्ण महाराष्ट्राला दिसत आहे.
“हिंदू धर्माचे सण आमच्या इतके कोणी करत नाही’
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, उदय सामंत साहेब काय म्हणाले मला माहिती नाही. परंतु गणेशोत्सव जरी असला तरी गेल्या वर्षी पण होता. आम्ही हिंदू धर्माचे सण आमच्या इतके कोणी करत नाही. त्यामुळे सण आमचा आहे. मागणी आमची आहे. कुठेही अडथळा येणार नाही. गेल्या वर्षी सुद्धा आला नाही. मग तुम्ही वर्षभर काय केलं? गेल्या वर्षभरापासून आम्ही तुम्हाला संधी दिली. तुम्हाला वेळ दिला. लाडभाऊ आल्यापासून सहा महिने झालेत आमच्या आरक्षणाच्या लढ्याच्या प्रकरणात आले आहेत. तेव्हा पासून वेळ दिला. त्याच्यानंतर विखे पाटील हे सगळे आले. मे पासून तीन महिने दिले आणि तुम्हाला आता आजपासूनही आठ दिवस संधी आहे. चूक कोणाची? माझी काय चुकी आहे? माझ्या मराठ्या समाजाच्या लेकरांना मी आरक्षण नाही मागायचं का? मी झुंजायचं नाही का? संधी देऊन तुम्ही चुका करणार आणि म्हणणार मुंबईला येऊ नका. असं कसं होईल. आम्ही तुम्हाला तीन वर्ष संधी दिली. 29 ऑगस्ट 2023 पासून संधी दिली.
सरकारवर निशाणा
सरकारवर निशाणा साधते ते पुढे म्हणाले की, सरकारला नास्केपणा लागला आहे. सरकारचे असणारे मंत्रीमंडळ आणि सरकारची प्रवृत्ती अतिशय नीच झाली आहे. एखाद्याला काही द्यायचे नसेल सत्तेत येऊन तर तुम्ही आडवं चालणार. कुठे चौकशी कर, कुठे जवळचे अडचणीत आण. त्याने आंदोलन थांबत नाही. त्याने आंदोलन जास्त पेट घेत आहे. त्याने जास्त रोष निर्माण होतो. तुम्ही माझ्या जवळच्या सहकाऱ्याला त्रास देणार आंदोलनाच्या काळात महाराष्ट्राला कळतं हे जाणून बुजून आहे. यापूर्वी वर्ष- दोन वर्षापूर्वी तुम्हाला जमलं नाही का? किंवा इथून पुढे एकवर्ष जमलं नाही का? नेमकं आंदोलनाच्याच कामात का? आणि चौकशा पण अशा दिवशी शनिवारी आणि रविवारी. इतके अँक्टीव्ह?
सध्या राज्यात पडणाऱ्या पावसाबाबत देखील त्यांनी वक्तव्य केले. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, पाऊस पडल्यामुळे शेतीत चांगले पीक येणार आहेत. त्यामुळे काम पण नाही. पाऊस पण आहे आणि काम पण नाही. म्हणजे सगळं आनंदाचे वातावरण आहे. मुंबईकडे आता आणखी जास्त लोक येतील. मुसळधार पाऊस असला तरीही मराठे आता मुंबईकडे येणार आहेत आणि कडक ऊन जरी असलं तरी मराठे मुंबईत येणार आहेत. हे पुन्हा पुन्हा वारंवार सांगावं लागत आहे. आमच्यासाठी आनंदाचा क्षण म्हणजे शेतकऱ्यांसाठी पाऊस आवश्यक होता आणि पाऊस झाल्यामुळे खूप आनंदाचं वातावरण आहे.
