स्वत:च्या वडिलांचा पुतळा देखील सरकारच्या खर्चाने उभारला…नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला

narayan rane: उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व अन् शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन कामाई केली. स्वत:च्या वडिलांचा पुतळा सरकारच्या खर्चाने उभारला. ते आम्हाला शिवद्रोही म्हणतात. आम्ही आता लवकरात लवकर या ठिकाणी शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा बसवणार आहोत.

स्वत:च्या वडिलांचा पुतळा देखील सरकारच्या खर्चाने उभारला...नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला
narayan rane
| Updated on: Aug 28, 2024 | 3:00 PM

निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत. त्यांनी आतापर्यंत ५० लोकांना तरी रोजगार दिला आहे का? त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी पुतळा उभारला का? अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केले? आठ महिन्यांपूर्वी हे नेते कधी महाराजांच्या पुतळ्यासमोर आले का? असा हल्ला भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या वडिलांचा पुतळा देखील सरकारच्या खर्चाने उभारला आहे, असा घणाघात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. मालवणमधील महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते.

लवकरात लवकर नवीन पुतळा उभारणार

उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व अन् शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन कामाई केली. स्वत:च्या वडिलांचा पुतळा सरकारच्या खर्चाने उभारला. ते आम्हाला शिवद्रोही म्हणतात. आम्ही आता लवकरात लवकर या ठिकाणी शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा बसवणार आहोत. या प्रकरणी दोषी असलेल्या लोकांवर कठोर कारवाई करणार आहोत, असे नारायण राणे यांनी म्हटले.

आता शरद पवार काय करत आहेत?

उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत काय केले. शरद पवार निवृत्तीनंतर काय करत आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रात मंत्री होते, तेव्हा मराठा आरक्षण देऊ शकले नाही. आता राजकारण करत आहेत. शिवसेना राड्यामुळे ओळखली जाऊ लागली. शिवसेना उदयास कशी आली हे आदित्य ठाकरे यांना माहीत नाही. राजकोट येथील किल्ल्यावर आम्ही आमच्या जागेवर उभे होतो. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या रस्त्याने जावे, ही अपेक्षा होती. त्यांनीच या ठिकाणी गोंधळ केला, असा आरोप नारायण राणे यांनी केला.

मालवणमधील घटना दुर्देवी होती. आठ महिन्यांपूर्वी या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केले होते. हा पुतळा ज्यांनी बांधला, त्यांची चौकशी करावी. पुतळा कशामुळे कोसळला? हे कारण समोर यावे, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.