Modi Cabinet Expansion : नारायण राणेंना केंद्रात मंत्री बनवण्यामागे भाजपाची कोणती खेळी असू शकते? हे 5 कारणे लक्षात ठेवा!

| Updated on: Jun 14, 2021 | 10:34 PM

नारायण राणेंना जर खरंच केंद्रीय मंत्री केलं तर त्या पाठीमागे भाजपाचं नेमकं गणित काय असू शकेल याचा अंदाज 5 मुद्यांच्या माध्यमातून घेऊयात.

Modi Cabinet Expansion : नारायण राणेंना केंद्रात मंत्री बनवण्यामागे भाजपाची कोणती खेळी असू शकते? हे 5 कारणे लक्षात ठेवा!
केंद्रीय मंत्री नारायण राणे
Follow us on

मुंबई : नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार निश्चित मानला जातो आहे. तोही पुढच्या काही दिवसातच तो केला जाईल अशा चर्चा दिल्ली वर्तूळात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या एका नेत्याची केंद्रीय मंत्रिमंडळातून गच्छंती होईल तर नारायण राणे आणि प्रीतम मुंडे यांची नव्यानं वर्णी लागेल असं सांगितलं जात आहे. त्यातल्या त्यात राणेंना जर खरंच केंद्रीय मंत्री केलं तर त्या पाठीमागे भाजपाचं नेमकं गणित काय असू शकेल याचा अंदाज 5 मुद्यांच्या माध्यमातून घेऊयात. (BJP’s thought behind giving Narayan Rane a ministerial post at the Center)

1. मराठा चेहरा

महाराष्ट्रातला मराठा आरक्षणाचा मुद्दा संपलेला नाही. प्रमुख राजकीय पक्ष अजूनही याच मुद्यावर आगामी निवडणुकांची तयारी करताना दिसत आहेत. नारायण राणे हे मराठा आरक्षणाचा महत्वाचा आवाज झालेले आहेत. त्यांनी कधी शिवसेनेवर शरसंधान साधलं तर कधी थेट संभाजी छत्रपती यांनाही फटकारायचं सोडलं नाही. अर्थातच भाजपला याची कल्पना नाही असं नाही पण राणेंना मंत्री केलं तर मराठा समाज त्यातल्या त्यात युवा वर्ग भाजपच्या पाठिशी राहील असं गणित असू शकतं. विशेष म्हणजे राणेंच्या अध्यक्षतेखाली तयार झालेल्या समितीनं मराठा आरक्षणाची शिफारस केली होती हे विसरता येणार नाही.

2. शिवसेनेचा कट्टर विरोध

राणे शिवसेनेचे नेते म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. बाळासाहेब असतानाच ते सेनेतून बाहेर पडले. कारण उद्धव ठाकरेंशी त्यांचं जमलं नाही. नंतर राणे थेट काँग्रेसमध्ये गेले. मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी प्रसंगी काँग्रेस नेतृत्वावरही तोंडसुख घेतलं. नंतर ते तिथूनही बाहेर पडले आणि भाजपात गेले. भाजपानं त्यांना राज्यसभेवर खासदार केलं. दोन्ही मुलं राज्याच्या राजकारणात सक्रिय राहीले. या सगळ्या काळात नारायण राणेंच्या टार्गेटवर कोण राहिलं असेल तर ते उद्धव ठाकरे. शिवसेना. सध्या भाजपच्या टार्गेटवरही शिवसेना आणि तिचं नेतृत्व आहे. त्यामुळेच राणेंना बळ देऊन सेनेला आणखी नामोहरम करण्याचा प्लॅन असू शकतो.

3. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक

महाराष्ट्रात आगामी काळात सर्वात मोठी निवडणूक आहे ती मुंबई महापालिकेची. शिवसेनेसाठी मुंबई महापालिका म्हणजे अस्तित्वाची लढाई. शिवसेनेचा जीव की प्राण म्हणजे मुंबई. ती मुंबईच हाती घेण्याच्या प्रयत्नात भाजपा आहे. त्यासाठी त्यांनी आधीच अतुल भातखळकरांसारख्या मराठी नेत्याला पुढे केलेले आहे. त्यात आता राणेंना मंत्री केलं तर मुंबईची लढाई भाजपसाठी काहीशी सोपी होऊ शकते. राणेंना मंत्री करताना मुंबई पालिकेच्या निवडणूकीत त्यांचा होणारा फायदा दुर्लक्षित करता येणारा नाही.

4. भाजपात आलेल्यांना मानाचं पान

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात नेते मंडळी भाजपात दाखल झाली. राज्यात भाजपचेच सरकार येईल आणि सत्तेचा मेवा चाखता येईल असा त्यांचा अंदाज असावा. पण तो चुकीचा ठरला. त्यानंतर भाजपात अजून तरी महत्वाची पदं हे निष्ठावंतांकडेच आहेत. जी नेते मंडळी
भाजपात आली त्यांना अजूनही काहीसं उपरं वाटतं. राणेही भाजपात आलेले नेते आहेत, त्यांना मंत्री करुन इतर नेत्यांनाही ‘तुमचीही वेळ येईल’ असा संदेश देण्याचा यातून प्रयत्न असू शकतो.

5. चर्चेतल्या चेहऱ्याला संधी

महाराष्ट्रातून मोदींच्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी, पीयुष गोयल, जावडेकर, दानवे, धोत्रे अशी काही मंडळी मंत्री आहेत. यातले गडकरी सोडले तर तसा कुणाचा फार मोठा राज्यात बेस नाही. दानवे एका मतदारसंघापुरतेच आहेत. जावडेकर, गोयल हे नेते मोदी कृपेने मंत्री आहेत. त्यामुळेच मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातले पाच सहा जण मंत्री असूनही त्यांचा रोजच्या राजकीय डावपेचात किती फायदा होतो हा सवाल आहेच. त्यामुळेच राणेंना मंत्री केलं तर त्यांच्या पदाचा थेट फायदा भाजपला राजकीय गणित जुळवताना होऊ शकतो.

संबंधित बातम्या :

Modi cabinet expansion 2021 : नारायण राणे, प्रीतम मुंडेंना केंद्रात स्थान मिळण्याची शक्यता किती?

Modi cabinet expansion 2021 : प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता, मोदी कॅबिनेट विस्ताराच्या हालचाली

BJP’s thought behind giving Narayan Rane a ministerial post at the Center?