नवी मुंबईतील 57 नगरसेवकांचं भाजप प्रवेशावर एकमत, गणेश नाईकांच्या निर्णयाची प्रतीक्षा

| Updated on: Jul 29, 2019 | 4:58 PM

या नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे नवी मुंबई महापालिकेतील सत्ताही राष्ट्रवादीला गमवावी लागणार आहे. आता गणेश नाईक (NCP Ganesh Naik) यांच्या निर्णयाकडे लक्ष लागलंय.

नवी मुंबईतील 57 नगरसेवकांचं भाजप प्रवेशावर एकमत, गणेश नाईकांच्या निर्णयाची प्रतीक्षा
Follow us on

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची गळती सुरुच आहे. नवी मुंबईतील सर्वच्या सर्व 57 नगरसेवकांचं भाजप प्रवेशावर एकमत झालंय. सत्ताधारी पक्षात जाण्याबाबत सर्वच नगरसेवक आग्रही आहेत. त्यामुळे आता माजी मंत्री गणेश नाईक (NCP Ganesh Naik) यांनाही यासाठी विनंती करणार असल्याचं बैठकीनंतर एका नगरसेवकाने सांगितलंय. याबाबत महापौरांच्या निवासस्थानी बैठक झाली. या नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे नवी मुंबई महापालिकेतील सत्ताही राष्ट्रवादीला गमवावी लागणार आहे. आता गणेश नाईक (NCP Ganesh Naik) यांच्या निर्णयाकडे लक्ष लागलंय.

सत्तेत नव्हतो तरीही आम्हाला युती सरकारकडून कोणताही त्रास झाला नाही. पण शहराच्या विकासासाठी सत्तेत असणं गरजेचं असल्याने हा निर्णय घेतलाय. गणेश नाईक आमच्याकडून बोलवून घेतायेत अस नाही, हा आमच्या सगळ्यांचा निर्णय आहे. आमचं ठरलंच आहे, पण नेत्यांनाही हा निर्णय कळवणार आहोत. आमदार संदीप नाईकही आमच्यासोबत आहेत. 57 नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी एकाच वेळी प्रवेश करणार आहोत. स्थानिक नेत्यांच्या विरोधाचा फरक पडणार नाही, असं जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी म्हटलंय.

लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला देशासह महाराष्ट्रातही मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर अनेकांनी भाजपची वाट धरली आहे. गेल्या काही महिन्यांत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत कमळाला जवळ केलं. त्यामुळे ऐन विधानसभेच्या आधी राष्ट्रवादीसह काँग्रेसला मोठे भगदाड पडले आहे. त्यातच आता महापालिकांमध्येही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत.

गणेश नाईक नवी मुंबईतील सर्वात मोठा चेहरा

गणेश नाईक हा राष्ट्रवादीचा नवी मुंबई आणि ठाणे या भागातील सर्वात मोठा चेहरा आहे. 17  डिसेंबर 1992 रोजी नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे, असं म्हटलं तर वावगं ठरु नये. गणेश नाईक हे आधी शिवसेनेत होते. 1990 ला ते पहिल्यांदा नवी मुंबईतून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 25 मे 1999 रोजी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. तेव्हा गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील सत्तेची समीकरणं कितीही बदलली तरी नवी मुंबईत मात्र राष्ट्रवादीचीच सत्ता राहिली.

2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी लाटेमुळे गणेश नाईक यांना पराभव स्वीकारावा लागला. ते भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याकडून पराभूत झाले. राष्ट्रवादीच्या काळात गणेश नाईक यांनी अनेक महत्त्वाची पदं सांभळली. ते ठाण्याचे पालकमंत्री होते. तसेच, ते कामगार, उत्पादन शुल्क आणि पर्यावरण मंत्रीही होते. गणेश नाईक यांचा मुलगा संदीप नाईक हे सध्या नवी मुंबईतील ऐरोलीचे आमदार आहेत.