‘देवेंद्र फडणवीस यांनी समझौता करण्यासाठी माणूस पाठवला आणि…’, अनिल देशमुख यांचा मोठा गौप्यस्फोट
"उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीनच्या काड्या ठेवल्याप्रकरणात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा संबंध असल्याचे समोर आल्यावर मी त्यांना निलंबित केलं. त्यानंतर परमबीर सिंह यांनी माझा बदला घेतला", असा दावा अनिल देशमुख यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी अनिल देशमुख यांना पुष्पगुच्छ देवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजित कार्यक्रमात अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत मोठा गौप्यस्फोट केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री होते. पण त्यांच्यावर तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी कथित 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना एकवर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावं लागलं. याशिवाय अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने कठोर कारवाई केली. या सर्व घडामोडींनंतर अनिल देशमुख यांना काही महिन्यांपूर्वी जामीन मंजूर झालाय. आपल्या कोणत्या परिस्थितीत जावं लागलं, तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यासाशी समझौता करण्यासाठी माणूस पाठवला होता, असा मोठा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला.
“महाविकास आघाडीच्या विदर्भात लोकसभेच्या 10 पैकी 10 जागा जिंकून येतील”, असा दावा अनिल देशमुख यांनी भाषणाच्या सुरुवातीला केला. तसेच “एका-एका आमदाराला 50-50 कोटी देऊन फोडले”, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला. “फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. कापसाला भाव कमी मिळाला. परदेशातून कापूस आयात केला. त्यामुळे कापसाचे भाव पाडले”, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला. यावेळी अनिल देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. “मोदी नालायक आहेत, ते पंतप्रधान होण्याच्या लायकीचे नाहीत”, अशी टीका अनिल देशमुख यांनी केली.
अनिल देशमुख यांचा मोठा गौप्यस्फोट काय?
“उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीनच्या काड्या ठेवल्याप्रकरणात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा संबंध असल्याचे समोर आल्यावर मी त्यांना निलंबित केलं. त्यानंतर परमबीर सिंह यांनी माझा बदला घेतला. माझ्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करुन मला अटक केली. कोर्टाने सांगितलं की, त्यात कोणतेही तथ्य नाही. ऐकीव माहितीवर आरोप केले. ईडी सुप्रीमकोर्टमध्ये गेली. पण त्यांची याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर तब्बल 14 महिन्यांनी मी बाहेर आलो. देवेंद्र फडणवीस यांनी समझौता करण्यासाठी एक माणूस पाठवला, एक शपथपत्र द्या, तुम्हाला ईडीकडून त्रास होणार नाही, असं सांगितलं. मात्र मी तसं केलं नाही, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर आरोप करणारे शपथपत्र होते”, असा मोठा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला.