उद्धव ठाकरेंची झोप उडवणारं भाकित, आता आमदारही फुटणार; केंद्रीय मंत्र्याच्या विधानाने खळबळ
Shivsena UBT : आगामी काळात ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण एका केंद्रीय मंत्र्याने याबाबत मोठं भाकित केलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही काळापासून खळबळ उडालेली आहे. अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षाची वाट धरलेली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आगामी काळात ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी याबाबत मोठं विधान केले आहे. आठवले नेमकं काय काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
उद्धव ठाकरेंचे आमदारही फुटणार – आठवले
कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले यांनी म्हटले की, ‘आता उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त आंदोलन करणं हेच काम राहिलं आहे. खासदार फुटले आहेत आता आमदार देखील फुटतील. अयोध्या मंदिरात घोटाळा झाला आहे, रामाशी बेईमानी करणं योग्य नाही. योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राम मंदिरात झालेला घोटाळा एनडीए खपवून घेणार नाही. उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाऊन रामाचं दर्शन घ्यावं.’
एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे खरे नेते – आठवले
पुढे बोलताना आठवले म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार-खासदार ठेवण्याची कुवत नाही. या सगळ्या फोडाफोडीला अमित शाह यांना जबाबदार धरू नये. हे ऑपरेशन टायगर आहे, ऑपरेशन देवेंद्र नाही. एकनाथ शिंदे हेच खरे शिवसेनेचे खरे नेते आहेत अशी शिवसैनिकांची भावना आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे जात आहेत.’
राज ठाकरे हे भूमिका बदलणार नेते – आठवले
रामदास आठवले यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘इतके आमदार-खासदार आमच्याकडे येत आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी देखील आमच्याकडे यावे. राज ठाकरे यांना आमदार निवडून आणता येत नाही, त्यामुळे ते आमदार फुटतात असं म्हणतात. पण ते आमदार आमच्याकडे येतात, जे येतात त्यांना आम्ही घेतो. राज ठाकरे असं बोलतात म्हणून त्यांचे आमदार निवडून येत नाहीत. राज ठाकरे हे भूमिका बदलणारे नेते आहेत.’