गोविंद ठाकूर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या दसरा मेळाव्यातील मंचावर ठाकरे कुटुंबातील लोकं होती. त्यामुळे शिंदे गट (shinde camp) ठाकरे कुटुंब फोडत असल्याचा आरोप होत आहे. या आरोपाचा समाचार घेताना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (ramdas kadam) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर ठाकरे कुटुंब फुटले नाही. गेल्या 20 वर्षात उद्धव ठाकरे यांनीच त्यांचे कुटुंब फोडले. हे त्यांनाही माहीत नाही, असा आरोप करतानाच जयदेव ठाकरे यांच्याकडे गेले तेव्हा एकनाथ शिंदे दाढीवाले मुख्यमंत्री नव्हते. उद्धव ठाकरे स्वतःचे कुटुंब सांभाळू शकत नाहीत, ते महाराष्ट्र आणि शिवसेना काय सांभाळणार? असा सवाल रामदास कदम यांनी केला.
रामदास कदम हे मीडियाशी संवाद साधत होते. उद्धव ठाकरे यांना असे दिवस आलेत की ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवावर बोलत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. त्यांची मानसिक अवस्था बिकट झाली आहे. शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यातून ते दिसून आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यावरील राग समजू शकतो. पण त्यांच्या मुलावर टीका का? त्यांच्या मुलाचा मुलगा म्हणजे त्यांचा नातू अवघा दीड वर्षाचा आहे. तुम्ही दीड वर्षाच्या मुलावर बोलत आहात, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
एकनाथ शिंदे यांच्या नातवाला नगरसेवक व्हायला 25 वर्ष लागतील. तो मुख्यमंत्रीही होऊ शकतो. घराकडे बघू नका. उद्धव ठाकरे यांनी माझ्यासह एकनाथ शिंदे यांना राजकारणातून दूर करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावरही टीका केली. चंद्रकांत खैरे संपले आहेत. आता उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी ते बोलत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
निवडणूक आयोगाकडे चिन्हावर सुनावणी होणार आहे. लोकशाहीत कोणाचा आकडा जास्त, आमदार, खासदार कोणाचे जास्त, हे दसरा मेळाव्यात दिसले. शिवाजी पार्कमध्ये एक लाख लोक होते. बीकेसीत दोन लाख लोक होते. आता उद्धवजींची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शिवसेना आहे, अशी टीका त्यांनी केली.
आमची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची हिंदुत्वाची शिवसेना आहे. आमचा विश्वास आहे की आम्हाला धनुष्यबाण 100% मिळतील. याशिवाय निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे, असंही त्यांनी सांगितलं.