अघोरीपणा करू नका; चंद्रकांत खैरेंनी एकनाथ शिंदेंना असं का म्हटलं?
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच शिवसेनेमध्ये संदीपान भूमरे यांचं योगदान काय असा सवालही खैरेंनी उपस्थित केला आहे.
औरंगाबाद : शिवसेना (Shiv Sena) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना झाली. त्यानंतर 1968 मध्ये मुंबई (Mumbai) महापालिकेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण चिन्हावरच शिवसेनेचे 42 नगरसेवक निवडून आले. तेव्हापासून धनुष्यबाण हे शिवसेनेचं चिन्ह आहे. मात्र आता काही जण पैशाच्या जोरदार शिवसेनेमध्ये फूट पाडायला निघाले आहेत. मात्र मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगतो की हा अघोरीपणा चांगला नसल्याचं खैरें यांनी म्हटलं आहे.
‘शिवसेनेने अनेकांना मोठं केलं’
पुढे बोलताना चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे की, शिवसेनेने अनेकांना मोठं केलं. सुरुवातीच्या काळात मराठीचा मुद्दा उचलून धरला, त्यामुले आज मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणूस ताठ मानेने जगत आहे. पुढील काळात शिवसेनेकडून हिंदूत्वाची भूमिका घेण्यात आली. औरंगाबादमध्ये 1885 साली शिवसेनेचा प्रवेश झाला. मी स्वत: दोन वेळा आमदार आणि चार वेळा खासदार झालो. माझ्यासारखे अनेक सामान्य माणसांना शिवसेनेने संधी देऊन मोठं केल्याचं खैरे यांनी सांगितलं.
‘भुमरेंचं योगदान काय’?
चंद्रकांत खैरे यांनी यावेळी आमदार संदीपान भुमरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. 1985 पासून मी शिवसेनेसोबत आहे. आम्ही शिवसेना वाढवण्यासाठी आंदोलने केली, जेलमध्ये गेलो, वेळप्रसंगी पोलिसांचा मारही खाल्ला. मात्र या सर्वांमध्ये संदीपान भूमरेंचं योगदान काय असा सवाल खैरेंनी केला आहे. आम्ही शिवसेना वाढवली म्हणून भूमरेसारखे आज निवडून येत असल्याचा टोला खैरेंनी लगावला आहे.
धनुष्यबाण आमचाच
दरम्यान धनुष्यबाण हे चिन्ह सुरुवातीपासून शिवसेनेचं आहे. ते आमचंच राहणार आहे. आम्हाला निवडणूक आयोग न्याय देईल अशी अपेक्षा असल्याचं खैरेंनी म्हटलं आहे.