Sanjay Raut : केसीआर, हेमंत सोरेन यांचं सरकार याच पद्धतीने पाडलं जाईल; ‘रोखठोक’मधून भाजपावर पुन्हा हल्लाबोल

| Updated on: Jul 24, 2022 | 7:48 AM

शिवसेनेचे (shiv sena) मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक या सदरातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर निशाणा साधला आहे.

Sanjay Raut : केसीआर, हेमंत सोरेन यांचं सरकार याच पद्धतीने पाडलं जाईल; रोखठोकमधून भाजपावर पुन्हा हल्लाबोल
Image Credit source:
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे (shiv sena) मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक या सदरातून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर निशाणा साधला आहे. जे विधानसभा सदस्य शिवसेनेतून बाहेर पडले त्यांचा युक्तिवाद एकच आहे तो म्हणजे, आमचीच शिवसेना खरी. आम्ही शिवसेना सोडली नाही! मात्र त्यांची ही भूमिका कातडी वाचविणारी असल्याची टीका रोखठोकमध्ये करण्यात आली आहे. पुढे रोखठोकमध्ये असे देखील म्हटले आहे की,घटना ही माणसांसाठी असेत, माणसे घटनेसाठी नसतात. घटनेतील 10 व्या शेड्युलनसार हे सोळाही आमदार अपात्र ठरणार आहेत. मात्र सरकारला वाचविण्यासाठी व शिवसेनेला कायमचे संपवून टाकण्यासाठी या 16 आमदारांना केंद्र सरकारमध्ये बसलेले लोक वाचवत आहेत, मात्र सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ काय निर्णय देते यावर आता देशाचे व लोकशाहीचे भवितव्य अवलंबून असल्याचे सामनामध्ये म्हटले आहे.

लोकशाहीचे भवितव्य अंधकारमय

पुढे रोखठोकमध्ये म्हटले आहे की, भारतामधील लोकशाहीचे भवितव्य कसे अंधकारमय झाले आहे त्यांचे प्रत्यंतर रोजच येत आहे. देशाचे सरन्यायाधीश श्री. रमण्णा यांनी देखील एका कार्यक्रमात लोकशाही आणि संसदेच्या भवितव्यावर चिंता व्यक्त केली आहे.विरोधी पक्षांची जागाही सत्ताध्याऱ्यांनी बळकावयाची हे चित्र घातक आहे, असे सरन्यायाधीश रमण्णा जेव्हा जाहीरपणे सांगतात तेव्हा भीती वाटू लागते. पण एकाधिकारशाही व हुकूमशाहीचे कितीही तांडव झाले तरी लोकशाही या देशात मरणार नसल्याचे रोखठोकमध्ये म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

बदला घेतला

‘महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाने लोकशाहीची मूल्ये उद्ध्वस्त केली हे केंद्रातील राज्यकर्ते मानायला तयार नाहीत. आमदारांना फोडले व खासदारही फुटले. उद्धव ठाकरे यांनी मोदी-शहांच्या विरोधात जाऊन सरकार स्थापन केले. त्याचा बदला शेवटी शिवसेनेत फूट पाडून घेण्यात आला. तेलंगणाचे के. सी. चंद्रशेखर राव व झारखंडचे हेमंत सोरेन यांची सरकारे भविष्यात याच पद्धतीने भरडली जातील. सोरेन यांच्या निकटवर्तीयांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडू लागल्याची टीकाही रोखठोकमधून करण्यात आली आहे. ज्या बंडखोर शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यावर केंद्रीय यंत्रणांचे खटले होते, अशा सर्वांना जाचातून मुक्त करण्यात आले आहे, त्यांना आता शांत झोप लागेल. इथे समान न्यायाचे तत्त्व चुकीच्या पद्धतीने राबवले जात आहे.भारतीय लोकशाही जिवंत आहे, पण ती कुणाची तरी आज बटीक असल्याची टीकाही रोखठोकमधून करण्यात आली आहे.