विरोधी पक्ष मोकळा आहे, डोकं रिकामं असतं, आरोप करतच असतात; संजय राऊतांची विरोधकांवर खोचक टीका

| Updated on: Jul 31, 2021 | 12:44 PM

संजय राऊत यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर हल्ला चढवला. राज्याने पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

विरोधी पक्ष मोकळा आहे, डोकं रिकामं असतं, आरोप करतच असतात; संजय राऊतांची विरोधकांवर खोचक टीका
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Follow us on

नगर: राज्यातील पूरपरिस्थितीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्ष मोकळा आहे. डोकं रिकामं असतं. आरोप करतच असतात, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. (shiv sena leader sanjay raut attacks bjp over flood situation in maharashtra)

संजय राऊत यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर हल्ला चढवला. राज्याने पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्याबाबत राऊत यांना छेडण्यात आले. त्यावर राऊत यांनी ही टीका केली. विरोधी पक्ष मोकळे आहेत. मोकळा माणूस असतो. डोकं रिकामं असतं. असे आरोप करत असतात. त्यांनाही माहीत आहे. त्यांनीही सरकार चालवलंय, त्यांनीही शासन चालवलंय, अशी टीका राऊत यांनी केली.

पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरने घिरटी मारावी

पंतप्रधानांनी महाराष्ट्रात यावं. हेलिकॉप्टरवरून घिरटी मारावी आणि गुजरातला दिले तसे हजार कोटी द्यावेत. ताबडतोब द्यावेत, असा टोला लगावतानाच मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांसाठी काही निर्णय घेतले आहेत. आता तर प्रत्येकाच्या खात्यावर दहा हजार जमा होत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

लांडगा आला रे आला म्हणतात, लांडगा आलाच नाही

झारखंडमध्ये सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला. तसाच प्रयत्न महाराष्ट्रात होत आहे का? या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिलं. हा महाराष्ट्र आहे. एवढेच सांगू शकतो. विरोधक सरकार पाडण्याचा प्रयत्न करून थकलेले आहेत. भिंतीवर डोकं अपटून झालंय. डोकं फुटलंय, भिंत तशीच आहे. लांडगा आला रे आला… लांडगा आला रे आला… असं ते म्हणत असतात. पण लांडगा वगैरे काही येत नाही. बोलू द्या. त्यांचा वेळ जातोय ना त्यात. त्यांनी वेळ घालावा, अशी खोचक टीका करतानाच हे सरकार उरलेला तीन वर्षाचा काळ अगदी व्यवस्थितपणे पार पाडेल. त्यामुळे या काळात तरी कुणी पुन्हा येण्याची अजिबात शक्यता नाही. आणि भविष्यातही आजचीच व्यवस्था कायम राहील ही मला खात्री आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पक्ष चालवण्याचं अॅग्रीमेंट नाही

सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे का?, असा सवालही त्यांना करण्यात आला. हा समन्वय काय असतो? तीन पक्ष स्वतंत्रपणे काम करत आहेत. करत राहतात. प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने वाढत असतो. शरद पवार यांनी मागे त्याला एक उत्तर दिलं आहे. ते अधिक समर्पक आहे. आम्ही सरकार चालवण्याचं अॅग्रीमेंट केलं आहे. पक्ष एकत्र चालवण्याची आमची भूमिका नाही. प्रत्येकाने आपआपले पक्ष चालवावेत आणि वाढवावेत. आणि प्रत्येकाल तो अधिकार आहे. जेव्हा शिवसेना-भाजपची युती होती. तेव्हा दोन्ही पक्ष शतप्रतिशतचे नारे देत होते. त्यात चुकलं काय, असा सवाल त्यांनी केला.

शिवसेनेचा जिल्हा म्हणून ओळख व्हावी

संपूर्ण राज्यात गावपातळीवर शिवसेनेचं संपर्क अभियान सुरू आहे. त्याच्या समारोपाचा हा काळ आहे. जरी सरकार आमचं असलं तरी पक्षाचं संघटन अधिक मजबूतीनं काम करताना दिसलं पाहिजे. ही या मागची भावना आहे. शंकरराव गडाख आल्यापासून या जिल्ह्यात संघटन वाढत आहे. शिवसेनेचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख व्हावी हा प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले. (shiv sena leader sanjay raut attacks bjp over flood situation in maharashtra)

 

संबंधित बातम्या:

कुठेही जा, तुमची ओळखही शिवसैनिक म्हणूनच; संजय राऊतांचा राणेंना टोला

सुट्टीच्या दिवशीही पगार बँक खात्यात जमा होणार, 1 ऑगस्टपासून कोणकोणते नवे नियम लागू?

चिपळूणला पुराचा फटका का बसला?, पाटबंधारे विभागाचा अहवाल सरकारकडे; दिलं ‘हे’ कारण!

(shiv sena leader sanjay raut attacks bjp over flood situation in maharashtra)