Sanjay Raut ED Raid : संजय राऊतांना अटक करायचीच होती, त्यामुळे खोटे पेपर बनवून अटक; सुनील राऊत यांचा आरोप

Sanjay Raut ED Raid : स्वप्ना पाटकर यांची तक्रार बोगस आहे. यामागे किरीट सोमय्या यांचं कटकारस्थान आहे. आमच्याकडे बेनामी मालमत्ता होती तर इतके दिवस झोपले होते का? ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. संजय राऊत हे भाजपला भारी पडले होते.

Sanjay Raut ED Raid : संजय राऊतांना अटक करायचीच होती, त्यामुळे खोटे पेपर बनवून अटक; सुनील राऊत यांचा आरोप
संजय राऊतांना अटक करायचीच होती, त्यामुळे खोटे पेपर बनवून अटक; सुनील राऊत यांचा आरोप
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 01, 2022 | 8:47 AM

मुंबई: आधी साडे नऊ तास झाडाझडती, त्यानंतर पुन्हा ईडी (ED) कार्यालयात नेऊन चौकशी आणि त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. राऊत यांना अटक झाल्यानंतर त्यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. संजय राऊतांना (sanjay raut)अटक करायचीच होती. त्यामुळे खोटे पेपर बनवून त्यांना अटक केली आहे. त्यांना शिवसेनेचा आवाज दाबायचा आहे. उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) एकटं पाडण्यासाठी हे सर्व चाललं आहे. पण उद्धव ठाकरे एकटे पडणार नाहीत. लाखो करोडो शिवसैनिक त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत. आणखी संजय राऊत शिवसैनिकांमध्ये तयार करू आणि लढाई लढू, असा निर्धार सुनील राऊत यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊत यांना सोडवण्यासाठी आम्ही कायदेशीर लढाई लढू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सुनील राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ईडीची कारवाई झाली ना? त्यात काय विशेष? अटक केली. व्यवहार झाला नाही. साध्या माणसाकडे 50 लाखाचा व्यवहार झाला असेल तर लगेच अटक करतात का? घरासाठी मित्राकडून, नातेवाईकांकडून लोन घेतलं असेल तर ते काय मनी लॉन्ड्रिंग होतंय काय? असा सवाल सुनील राऊत यांनी केला.

भाजप मुक्त महाराष्ट्र करणार

हा देश स्वतंत्र करण्यासाठी सावरकर, टिळक, गांधी, भगत सिंह आणि सुभाषचंद्र बोस यांनी लढाच द्यायचा नाही असं ठरवलं असतं तर देश स्वातंत्र्य झाला असता का? तर नाही. भाजपला महाराष्ट्रातून मुक्त करण्यासाठी ही लढाई सुरू आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही, असं राऊत म्हणाले.

पत्राचाळ प्रकरणच बोगस

पत्राचाळ बोगस आहे. त्याच्याशी काडीमात्र संबंध नाही. एक कागद नाही. केवळ अटक करण्यासाठी त्यांना काही तरी कारण हवं होतं. शिवसेनेचा आवाज दाबायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं. ईडीची कारवाई बोगस आहे. राऊतांना अटक करण्यासाठी एक फ्रेम तयार केली आहे. त्यासाठी जे कागदपत्रं लावले आहेत. ते बनावट आहेत. आम्ही कोर्टात ते एक्सपोज करू, असं ते म्हणाले.

स्वप्ना पाटकर यांची तक्रार बोगस

स्वप्ना पाटकर यांची तक्रार बोगस आहे. यामागे किरीट सोमय्या यांचं कटकारस्थान आहे. आमच्याकडे बेनामी मालमत्ता होती तर इतके दिवस झोपले होते का? ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. संजय राऊत हे भाजपला भारी पडले होते. त्यामुळे त्यांना संपवण्याचं कटकारस्थान आहे. शिवसेना संपवण्यासाठीचा हा डाव आहे, असं त्यांनी सांगितलं.

भावासारखे संबंध असणारेही टीका करताहेत

आमचे ज्यांच्याशी भावासारखे संबंध होते. ते आज राऊतांवर टीका करत आहेत. ही शरमेची बाब आहे. भाजपच्या दबावाला बळी पडून ते टीका करत आहेत. त्यात रामदास कदमही आहेत, असा हल्लाही त्यांनी चढवला. समृद्धीचं प्रकरण काढा ना. समृद्धीसाठी पैसे वाटप करण्यात येत आहे. ते कुठून आले? असा सवालच त्यांनी केला आहे.