Gulabrao Patil: चुना कसा लावतात माहीत नाही राऊतला, पुन्हा टपरीवर बसवू म्हणणाऱ्या संजय राऊतांना गुलाबराव पाटलांचं पहिल्यांदाच थेट उत्तर
Gulabrao Patil: गुलाबराव पाटील गुवाहाटीत आहेत. यावेळी शिवसेनेच्या इतर बंडखोर आमदारांशी संवाद साधताना त्यांनी राऊतांवर पलटवार केला. आपल्या सर्वांवर आरोप होत आहेत. ते होत असतानाही अनेक लोक आपल्या पाठीही आहे.
गुवाहाटी: तो गुलाबराव पाटील (gulabrao patil) कोण होता, हे माहीत आहे का? हे गुलाबराव जळगावात पानटपरीवर बसायचे. चुना लावायचे. त्यांना शिवसेनाप्रमुखांनी वर आणलं. उद्धव ठाकरेंनी (cm uddhav thackeray) मंत्री केलं. त्यांनी आपल्याशी गद्दारी केली आहे. त्यांना पुन्हा टपरीवर नाही बसायला लावलं तर नाव बदलून ठेवा, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. राऊतांच्या या आव्हानावर शिवसेनेचे (shivsena) बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमची परिस्थित काहीच नव्हती. तरीही आम्हाला सर्वकाही मिळालं. शिवसेनेच्या आशीर्वादाने मिळालं. पण त्यात आमचाही त्याग आहे. आम्ही आमच्या घरावर तुळशी पत्रं ठेवली. आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाहीत. राऊत म्हणतात मला टपरीवर पाठवू. त्यांना चुना कसा लावता माहीत नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा चुना लावू, असा इशाराच गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
गुलाबराव पाटील गुवाहाटीत आहेत. यावेळी शिवसेनेच्या इतर बंडखोर आमदारांशी संवाद साधताना त्यांनी राऊतांवर पलटवार केला. आपल्या सर्वांवर आरोप होत आहेत. ते होत असतानाही अनेक लोक आपल्या पाठीही आहे. आपल्यावर भरपूर टीका झाली. बाप काढले. आपली प्रेते आणण्याची भाषा झाली. पण आमच्या जीवनाचा संघर्ष या लोकांना माहीत नाही. संजय राऊतांना आमची स्टोरी माहीत नाही. 92 च्या दंगलीत आम्ही तिघं भाऊ आणि आमचा बाप जेलमध्ये होतो. त्यावेळी राऊत कुठे होते माहीत नाही. कलम 56 काय असते 302 काय असते हे राऊतांना माहीत नाही. हे आम्ही सर्वांनी भोगलं आहे. तडीपाऱ्या काय असतात, दंगलीच्या वेळी पायी चालणं काय असंत हे त्यांना माहीत नाही. ते बाळासाहेबांचे फोटो लावून मोठे झाले. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन क्रिया केलेले कार्यकर्ते आहोत, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
राऊतांनी 35 लग्न लावून दाखवावीत
आमच्या यशात शिवसेनेचा 80 टक्के वाटा आहे. पण 20 टक्के आमचाही मेहनत आहे. आम्ही घरादाराचा त्याग करून संघटना वाढवत होतो. राऊतांनी 47 डिग्री सेल्सिअस तापमानात जळगावात येऊन 35 लग्न लावावेत. मी त्यांना बहाद्दर म्हणेल. त्याकाळात आम्हीच लग्न लावत असतो, असंही त्यांनी सांगितलं.
ते पवारांना सोडायला तयार नाहीत
कार्यकर्त्यांची लग्न, रात्री रक्ताची गरज पडणे, कार्यकर्त्यांचं दु:ख, मरण-सरण या सर्वात आम्हीच असतो. कार्यकर्त्यात विश्वास आहे की आम्ही शिवसेनेत आहोत. आपण 39 आणि 11-12 अपक्ष एवढेच आपण सभागृहात आलो, तर डिबेटला आपण काफी आहोत. त्यांनी वर्षा सोडली, आमदार सोडले, पण ते शरद पवारांना सोडायल तयार नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.