Sanjay Raut: 2-5 आमदार फुटले म्हणून पक्षाची मालकी एखाद्या ऐऱ्यागैऱ्याकडे जात नाही; संजय राऊत यांचा हल्लाबोल
Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांनी नुकताच पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांचा ठाण्याचे टिकूजीराव असा उल्लेख केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना कोणाची, यावरून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यावर मोठे विधान केले आहे. त्यांनी 2-5 आमदार फुटले म्हणून पक्षाची मालकी एखाद्या ऐऱ्यागैऱ्याकडे कशी जाऊ शकते? असा सवाल केला आहे.
“मूळ पक्षाचे प्रमुख हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे”
संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अप्रत्यक्षपणे न्याय व्यवस्थेवर म्हणजे सुप्रिम कोर्टावर खासदार किंवा पक्षफुटी संदर्भात जो खटला सुरु आहे त्याबाबत सुप्रिम कोर्टावर अप्रत्यक्ष दबाव आणत आहेत. याविषयी त्यांनी (शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी) एक ठाम भूमिका मांडली. आणि ती भूमिका चुकीची नाहीये. चार वर्ष प्रलंबीत असलेला खटल्याची सुनावणी आता सुरु झाली. पक्ष आणि चिन्हाबाबत. हे जे ठाण्याचे टिकूजीराव आहेत त्यांना परस्पर पक्ष दिलाय निवडणूक आयोगाने. विधीमंडळातील आमदार सोडून गेले म्हणून. आता विधीमंडळातला पक्ष वेगळा आहे मूळ पक्ष वेगळा. मूळ पक्षाचे प्रमुख हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आहेत आणि तो पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपावला. आम्ही सगळे मूळ पक्षासोबत काम करतो आहोत.
पुढे ते म्हणाले, विधीमंडळातले 2-5 आमदार फुटले म्हणून पक्षाची मालकी एखाद्या ऐऱ्यागैऱ्याकडे कशी जाऊ शकते? आमदार फोडले आता खासदार फोडले आणि फुटलेले खासदार.. मी तर काल म्हणाले की प्रधानमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी केटरिंग सर्विस सुरु केली आहे. गद्दारांनी यावं आणि खावून जावं. तुम्हाला गद्दारांना जेवण घालायला वेळ आहे मात्र, तृणमूळच्या, आम आदमी पार्टीच्या, शिवसेनेच्या पण संसदेमध्ये 16 दिवस झाले विरोधीपक्ष तुम्ही येण्याची मागणी करत आहे तिकडे तुम्ही येऊ शकत नाही?
पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करते ते म्हणाले, या देशाच्या लोकशाहीची आणि संविधानाची इतकी विटंबना गेल्या 75 वर्षात झाली नसेल. सहा खासदारांना तुम्ही बोलवलंत. ढोकळा, फापडा, जिलबी खायला घातलीत असं खासदरा बाहेर येऊन सांगतात. त्यातल्या एका खासदाराला तुम्ही जिलबी भरवत होतात. खाओ खाओ… हे काय प्रधानमंत्र्याचं काम आहे का? तुम्ही गद्दारांना बोलावता ज्यांच्यावर गुन्हा आहे अपात्रतेचा, तुम्ही न्यायालयावर दबाव टाकताय मी यांच्या पाठीशी आहे. पण संविधान नरेंद्र मोदींपेक्षा मोठं आहे. लक्षात घ्या. या देशाची घटना ही मोदींपेक्षा मोठी आहे आणि सुप्रिम कोर्ट देखील मोदींपेक्षा मोठं आहे. आम्हाला खात्री आहे ते निष्पक्ष न्याय देतील. आम्हाला संविधानानुसार न्याय पाहिजे. आम्हाला मेहेरबानी नको आहे किंवा न्याय विकत नको आहे हा पहिला विषय.
