दोन्ही शिवसेना एकत्र येतील, पण… शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा काय? उद्धव ठाकरेंना काय केलं आवाहन?
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दोन आठवड्यांमध्ये मोठा धक्का बसला आहे. सचिन अहिर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला असून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर एका बड्या नेत्याने मोठे विधान केले आहे.

दोन आठवड्यांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का बसला आहे. 6 खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सचिन अहिर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला. शिवसेना शिंदे गटामध्ये सामील झालेल्या सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करताना उद्धव ठाकरे गटाला मोठा संदेश दिला आहे.
“पुढे राजकारण करायचे असेल तर शिंदे साहेबांसोबत राहावे लागेल”
अब्दुल सत्तार म्हणाले की, “आमदार, खासदार, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य यांचा एकनाथ शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. पुढे राजकारण करायचे असेल तर शिंदे साहेबांच्या सोबत राहूनच करता येईल.” ते पुढे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत सहा खासदार मिळवणे हा पहिला टप्पा होता. आता विधान परिषदेत दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. पुढील टप्पा म्हणजे विधानसभा, जिथे मोठा प्रयोग होणार असल्याचे त्यांनी सूचित केले.
सचिन अहिर यांच्यावर संजय पाटील यांना थांबवण्याची जबाबदारी
सचिन अहिर यांच्या प्रवेशाबाबत अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, संजय दिना पाटील यांच्यासोबत दोघांवर जबाबदारी होती. “त्यांनी जे काम केले ते बरोबर केले. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचा त्यांच्यावर विश्वास बसला आणि त्यांना विधान परिषदेचे उपसभापती पद देण्यात आले,” असे सत्तार म्हणाले.
ठाकरे गटाला दुसरा धक्का
अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे पहिल्यांदा ग्रामीण भागात बाहेर आले त्याचे शिल्पकार कोण असेल तर एकनाथ शिंदे साहेब आहेत. एकनाथ शिंदे साहेब बोलले घरात बसून पक्ष चालत नाही म्हणून ते बाहेर आले. ते बाहेर आले तर वरळी आमचे जुने सहकारी आहेत आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील प्रमुख नेता, जबाबदार व्यक्ती प्रमुख राजकारणी ज्यावेळेस शिंदे साहेबांवर विश्वास व्यक्त करतो त्यावरून तुम्ही अंदाज लावा. आता अशी परिस्थिती झाली प्याचं कुठे लावायचं, सर्व घर आता गळू लागल आहे. 2022 पासून पक्ष संघटन मजबूत करण्यात आतापर्यंत स्वर्गीय बाळासाहेबानंतर कोण असेल तर एकनाथ शिंदे साहेब आहेत.
“ठाकरेंकडून लोक का जात आहेत?”
अब्दुल सत्तार यांनी सर्वधर्मसमभाव, विकास कामे आणि मागासवर्गीय-मुस्लिम समाजाला संधी देण्याबाबत शिंदे सरकारचे कौतुक केले. “शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे, तरी परभणीमध्ये मुस्लिम तरुणाला विधान परिषदेची संधी दिली. मी एकटा मुस्लिम आमदार होतो, आता दोन झाले. मागासवर्गीय समाजातील वाघमारे ताईंना खासदार केले,” असे त्यांनी सांगितले.
ठाकरेंनी काय करावे?
अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट शब्दांत उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला. “मला वाटते, भविष्यात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे साहेबांना भेटून एकत्र यायला हवे. शिवसेना एक होईल, पण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. त्यांनी शिंदे साहेबांचे नेतृत्व स्वीकारले पाहिजे. एकनाथ शिंदे साहेब अचूक निर्णय घेतात आणि त्याचे परिणाम राजकारणात दिसतात. लोकसभेत आमचे १३ खासदार आहेत. काँग्रेसनंतर सर्वाधिक खासदार एकनाथ शिंदे गटाकडे आहेत” असे ते म्हणाले.
