ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या; पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण करतोय; राऊतांचा विरोधकांना चिमटा

| Updated on: Oct 31, 2020 | 12:22 PM

आम्ही सत्ते आलो तेव्हा आमच्या सरकारला हिणवलं गेलं. ठाकरे सरकार अल्पावधीतच कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या. पण पुढच्या महिन्यात आम्ही एक वर्ष पूर्ण करत आहोत, असा चिमटा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काढला.

ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या; पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण करतोय; राऊतांचा विरोधकांना चिमटा
Follow us on

पुणे: आम्ही सत्तेत आलो तेव्हा आमच्या सरकारला हिणवलं गेलं. ठाकरे सरकार अल्पावधीतच कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या. पण पुढच्या महिन्यात आम्ही एक वर्ष पूर्ण करत आहोत, असा चिमटा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काढला. (shivsena leader sanjay raut slams bjp)

पुण्यात श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापाला संबोधित करताना संजय राऊत यांनी आज तुफान फटकेबाजी केली. राज्यात तीन पक्षाचं सरकार आलं. तेव्हा हे सरकार जास्त दिवस चालणार नाही, असं सांगितलं गेलं होतं. ठाकरे सरकार लवकर कोसळेल अशा पैजा लावल्या होत्या. पण पुढच्या महिन्यात आम्ही आता एक वर्ष पूर्ण करत आहोत, असा चिमटा राऊत यांनी विरोधकांना काढला. राज्यातील सरकार पडणार नाही. राज्यातील सरकार पडेल असं केंद्रातील नेत्यांनी कधीच म्हटलं नाही. राज्यातील नेते म्हणायचे. त्यांनीही आता असं बोलणं बंद केलं आहे, असंही ते म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता. आता महाराष्ट्राचा राजकारणाचा केंद्रबिंदू पुण्यात आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

पाप केलं नाही तर भीती कशाची?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांपैकी कुणाची भीती वाटते? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर मोदी आणि शहा यांची भीती वाटत नाही. तसं कारणही नाही. भीती वाटत असेल तर त्यांच्या लोकांना वाटली पाहिजे. आम्हाला वाटण्याचं कारण नाही. पाप केलं नाही तर भीती कशाची?, असा सवालही त्यांनी केला. शरद पवार यांचीही भीती वाटत नाही. पण लोकांमध्ये जाणारा लोकनेता आम्ही पाहिला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही लोक घाबरायचे. पण त्यांना भेटायचे तेव्हा त्यांच्या प्रेमात पडायचे, असंही त्यांनी सांगितलं.

पंकजा मुंडेंबाबत सूचक विधान

पंकजा मुंडे या शिवसेनेत येणार आहेत का?, असा सवाल केला असता पंकजाला आम्ही ऑफर दिली नाही. आमच्याकडे उद्धव ठाकरेच ऑफर देतात. दुसरं तिसरं कुणी देत नाही. अर्जुन खोतकर हे मराठवाड्यातील नेते आहेत. त्यांचं पंकजा यांच्याशी काय बोलणं झालं माहीत नाही, असं सांगतानाच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असताना चार वर्षे खदखद व्यक्त करत होते. त्याचं नंतर काय झालं सर्वांनाच माहीत आहे. पंकजा मुंडेंबाबत मला माहीत नाही, असं सूचक विधानही त्यांनी केलं. (shivsena leader sanjay raut slams bjp)

 

संबंधित बातम्या:

बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात; राऊतांचं सूचक विधान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना पत्र, कांदा व्यापाऱ्यांची साठवणूक क्षमता वाढवण्याची मागणी

(shivsena leader sanjay raut slams bjp)