Sushma Swaraj : वकृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व!, वाचा करारी सुषमा…

| Updated on: Aug 06, 2022 | 10:56 AM

सुषमा स्वराज यांची आज पुण्यातिथी...

Sushma Swaraj : वकृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व!, वाचा करारी सुषमा...
Follow us on

मुंबई : परदेशात घुमलेला भारताचा बुलंद आवाज म्हणजे देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज! अभ्यासू वक्त्या. कर्तृत्वाच्या जोरावर हरियाणाकी कुडी ते संसदेतील भाजपचा आवाज बनल्या, अन् परदेशात भारताचं नेतृत्व केलं, अश्या करारी सुषमा स्वराज यांची आज पुण्यातिथी आहे. आपलं वकृत्व, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत भाषेवरील प्रभुत्व, प्रभावी नेतृत्व कौशल्य, भाजपचा आक्रमक, पण संयत चेहरा अशी ओळख असलेल्या सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1953 रोजी हरियाणातील अंबाला छावणी परिसरात झाला होता. त्यांचे वडील हरदेव शर्मा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) स्वयंसेवक होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्या संघाशी संबंधित होत्या. अंबाला येथिल सनातन धर्म महाविद्यालातून स्वराज यांनी संस्कृत आणि राज्यशास्त्र विषयात बीए केलं. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून (Punjab University) कायद्याचं शिक्षण घेतलं. पुढे 1970 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून त्यांच्या आंदोलनात्मक आणि राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.

स्वराज यांनी 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयात आपल्या वकिलीला सुरुवात केली. त्यावेळी जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात लादलेल्या आणीबाणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे स्वराज कौशल यांच्याशी सुषमा यांची ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रिचं पुढे प्रेमात झालं. 1975 मध्ये या दोघांनी विवाह केला. स्वराज कौशल हे जॉर्ज फर्नांडिस यांचे सहकारी होते. त्यामुळे सुषमा स्वराजही पुढे फर्नांडिस यांच्या चळवळीची कायदेशीर बाजू सांभाळू लागल्या. इतकंच नाही तर आणीबाणीच्या काळात गाजलेल्या बडोदा डायनाईट प्रकरणात जॉर्ज यांचा बचाव करणाऱ्या वकिली समुहात सुषमा स्वराज यांचाही समावेश होता. पुढे पती स्वराज यांनी आपली वकिली कायम ठेवली तर आणीबाणीनंतर त्या भाजपमध्ये दाखल झाल्या. 1977 मध्ये वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी त्या हरियाणातून आमदार आणि मंत्रीही बनल्या. पुढे त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला आणि कधीही मागे वळून पाहिले नाही.

सोनिया गांधींविरोधातील बेल्लारीची निवडणूक

सुषमा स्वराज यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात 1999 मध्ये बेल्लारीतून दंड थोपटले होते. सोनिया यांनी अमेठी आणि बेल्लारी अशा दोन ठिकाणाहून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी भाजपनं परदेशी सून विरुद्ध भाजपची मुलगी अशी प्रचारनिती आखली होती. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी हे देखील स्वराज यांच्या प्रचारासाठी बेल्लारीत आले होते. असं असलं तरी निकाल काय लागणार हे स्पष्टच होते. मात्र, तरीही स्वराज यांनी निवडणूक लढण्याचे धाडस दाखवले. मात्र त्या निवडणुकीत स्वराज यांना पराभव पत्करावा लागला होता.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, सुषमा स्वराज यांच्यावर त्यावेळी केलेल्या दोन वक्तव्यामुळे त्यांच्यावर दोन शिक्के कायमस्वरुपली लागले. त्यातील एक म्हणजे स्वराज यांनी सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर केशवपन करुन श्वेतवस्त्रांमध्ये राहीन असं वक्तव्य केलं होतं. मात्र, सोनिया गांधी पंतप्रधानपदी विराजमान झाल्या नाहीत आणि स्वराज यांनाही त्यांचं वक्तव्य अमलात आणावं लागलं नाही. तर दुसरा मुद्दा म्हणजे, याच निवडणुकीत स्वराज यांनी बेल्लारीचे वादग्रस्त खाणसम्राट रेड्डी बंधू हे आपल्या भावासारखे आहेत, असंही वक्तव्य केलं होतं.

परराष्ट्र मंत्रीपदाची कामगिरी गौरवास्पद

मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये सुषमा स्वराज यांच्यावर परराष्ट्र खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयासारखं खातं लोकाभिमुख केलं. परराष्ट्र मंत्री असताना स्वराज अवघ्या एका ट्विटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या भारतीयांना मोलाची मदत केली. तुम्ही जगात कुठेही असा, तुमचा देश तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे, अशी भावना स्वराज यांनी परदेशात असलेल्या भारतीयांच्या मनात निर्माण केली होती. इतकंच नाही तर स्वराज यांनी पासपोर्ट लवकर मिळावा म्हणून जी ऑनलाईन सुविधा सुरु केली. तो अगदी महत्वपूर्ण निर्णय ठरला. ज्यामुळे अनेकांचे पासपोर्टच्या अडचणी संपल्या. याच साठी त्यांनी मोबाईल अॅप देखील आणले.

महाराष्ट्रातील निवृत्त अधिकारी असलेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने अटक केल्यानंतर सुषमा स्वराज यांनी ज्या पद्धतीने काम केले. ते महत्त्वाचे ठरले. याच प्रकरणात त्यांनी हरीश साळवे यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडण्यात पाठवले. ज्याचा फायदा झाला. तसंच परदेशात अडकलेल्या अनेक भारतीय लोकांना त्यांनी ज्या प्रकारे तत्परतेने मदत केली. ती नक्कीच वाखाणण्याजोगी राहिली.

त्याचबरोबर चुकून पाकिस्तानात पोहोचलेली दिव्यांग युवती गीता 10 वर्षानंतर सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नाने भारतात परतली होती. 26 ऑक्टोबर 2015 मध्ये जेव्हा गीता भारतात परतली तेव्हा तिचा भारत की बेटी असा उल्लेख स्वराज यांनी केला होता. इतकंच नाही तर त्यांनी गीताच्या आई-वडिलांच्या शोधासाठी 1 लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं होतं.

निवडणूक न लढण्याचा निर्णय आणि निधन

सुषमा स्वराज यांनी आजारपणामुळे 2019 ची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या सक्रीय राजकारणापासून दूर झाल्या. असं असलं तरी काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर त्यांनी भाजप सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं. ‘हा दिवस या जन्मात पाहायला मिळाला अशी आपली इच्छा होती, तू पूर्ण झाली’, अशी प्रतिक्रिया स्वराज यांनी दिली होती. पुढे 6 ऑगस्ट 2019 रोजी वयाच्या 67 व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु असताना कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यावेळी संपूर्ण भारत शोकाकुल झाला होता.निवडणूक न लढण्याचा निर्णय आणि निधन सुषमा स्वराज यांनी आजारपणामुळे 2019 ची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या सक्रीय राजकारणापासून दूर झाल्या. असं असलं तरी काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर त्यांनी भाजप सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं. ‘हा दिवस या जन्मात पाहायला मिळाला अशी आपली इच्छा होती, तू पूर्ण झाली’, अशी प्रतिक्रिया स्वराज यांनी दिली होती. पुढे 6 ऑगस्ट 2019 रोजी वयाच्या 67 व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु असताना कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यावेळी संपूर्ण भारत शोकाकुल झाला होता.