पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Shivneri) यांनी आज शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर जाऊन अभिवादन केलं. यावेळी बोलताना अजित पवारांनी (Ajit Pawar Shivneri) किल्ले शिवनेरीच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने 23 कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती दिली.
अजित पवार म्हणाले, “पहिल्यांदाच एवढा उत्साह शिवभक्तांचा दिसत आहे. तरुण वर्ग मोठ्या संख्येने उत्साहाने आले आहेत. खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य आले आहे असं लोकांना वाटत आहे. इथे आल्यानंतर खासदार अमोल कोल्हे, तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी काही कामांची माहिती दिली. तातडीचे 23 कोटी रुपये आवश्यक असल्याचं सांगितलं. त्याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असता, उद्धव ठाकरेंनीही तातडीने 23 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले”
“शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी आजच्या आज 23 कोटी मंजूर केले. चार विभागांना विभागून 23 कोटी रुपये मंजूर केले आहेत. वन विभाग, पुरातन विभाग, पीडब्ल्यूडीला 23 कोटी रुपये पाहिजे, ते दिले जातील”, असं अजित पवारांनी सांगितलं.
इतिहास कालीन किल्ल्यांना हेरीटेज टच देऊन काम करण्याचा प्रयत्न आहे. ज्या मूलभूत गरजा आहेत, त्या पूर्ण केल्या जातील. खाली वस्तू संग्रहालय करण्याचासुद्धा सकारात्मक विचार केला जाईल, असं अजित पवार म्हणाले.
सरकारमध्ये मतभेद वगैरे असं काही नाही. सामंजस्य भूमिका घेऊन देश पातळीवर ज्या समस्या उद्भवतात त्या समस्यांमुळे महाराष्ट्रातील जनतेला त्रास होऊ नये, ही आमची भूमिका आहे. जातीय सलोखा रहावा सर्व प्रश्न शांतीने सुटावेत, हे प्रयत्न राज्याच्या प्रमुखांचे आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पण हीच भूमिका आहे, असं म्हणत अजित पवारांनी मतभेदाबाबतच्या चर्चांना छेद दिला.
इतके वर्ष उगाच दूर होतो : उद्धव ठाकरे
दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनीही यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. “इतके वर्ष उगाच दूर होतो. आता आम्ही एकत्र आल्यानंतर एवढी वर्ष उगाच घालवली असं वाटतंय. मात्र आता आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो आहोत, सर्व चांगलं होईल”, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या
इतके वर्ष उगाच दूर होतो, अनेक वर्ष वाया घालवली : उद्धव ठाकरे