Chanakya Niti : पती, पत्नीमध्ये पटत नाही? मग हा सल्ला ऐकाच, चाणक्य यांनी सांगितलं सुखी संसाराचं सूत्र
आर्य चाणक्य म्हणतात पती, पत्नी हे संसाररुपी रथाची दोन चाक असतात, दोन्ही चाक समान गतीने चालली तरच संसाराचा रथ देखील वेगाने धावतो, मात्र यातील एका चाकाने जरी गती बदलली तरी संसाराचं वाटोळं व्हायला फार वेळ लागत नाही, जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ तसेच कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आदर्श संसार कसा असावा? पती-पत्नीचं नातं कसं असावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, चाणक्य यांचे हे विचार आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात पती आणि पत्नी हे संसाररुपी रथाची दोन चाकं असतात. जोपर्यंत ही चाकं समान गतीने चालत आहेत, तोपर्यंत संसाराचा गाडा देखील सुरळीत चालतो. मात्र यातील एक चाक जरी गळालं किंवा एका चाकाची गती ही अधिक झाली तर अशा स्थितीमध्ये संसाराचं वाटोळं व्हायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे पती-पत्नी दोघांनीही एकमेकांचा आदर केला पाहिजे. पुरुष हा घरातील कुटुंब प्रमुख असतो, कुंटुबाच्या पालपोषणाची जबाबदारी त्याच्यावर असते, त्यामुळे पत्नीने नेहमी पतीचा आदर केला पाहिजे, तर पुरुष कमावतो, मात्र घर सुरळीत चालवण्यासाठी, मुलांवर योग्य संस्कार करण्यामध्ये आणि त्यांना लहानाचं मोठं करण्यात पत्नीची महत्त्वाची भूमिका असते, त्यामुळे पतीने देखील पत्नीचा आदर केला पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
आदर – चाणक्य म्हणतात संसारामध्ये पती आणि पत्नीची भूमिका समान असते, त्यामुळे दोघांनीही एकमेकांचा आदर केलाच पाहिजे. तरच तुमचा संसार दीर्घकाळ टिकू शकतो, जर तुम्ही आदर केला नाही तर घरात सतत भांडणं होत राहतील.
त्याग संयम – चाणक्य म्हणतात प्रत्येक दिवस हा काही सारखा नसतो, संसारामध्ये चढ -उतार सुरूच असतात. जेव्हा वाईट काळ असतो, तेव्हाच तुमची खरी परीक्षा असते, अशा काळात पती-पत्नीने कधीही एकमेकांची साथ सोडता कामा नये, अशावेळी जर तुम्ही संयम ठेवलात तर भविष्यात तुम्हाला निश्चितच यश मिळणार आहे.
सुख, दु:खात भागीदार – चाणक्य म्हणतात पत्नीने पतीच्या प्रत्येक सुख, दु:खात सहभागी झालं पाहिजे, त्याचप्रमाणे पतीने देखील पत्नीच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, तिच्या सुख, दु:खात सहभागी झालं पाहिजे.
प्रेम – चाणक्य म्हणता प्रेम हाच पती -पत्नीच्या नात्याचा मुळ आधार असतो, त्यामुळे संसाराची गोडी वाढते
अपेक्षा – चाणक्य म्हणतात संसार म्हटलं की अपेक्षा आल्याच त्यामुळे आपल्या जोडीदाराच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तसेच कधीही एकमेकांकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नये, असा सल्ला देखील चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
