Vastu Shastra : घराच्या या दिशेला चुकूनही ठेवू नका पाण्याची टाकी, वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये वास्तुरचना आणि घरातील वस्तूंची दिशा याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात ज्या वस्तू असतात त्या वस्तूंची एक विशिष्ट दिशा असते, जेव्हा ती वस्तू ठेवण्याची दिशा चुकते, तेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतात.

आपण रोजच्या जीवनामध्ये अशा काही छोट्या -छोट्या चुका करत असतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. जर घरात वास्तुदोष निर्माण झाला तर त्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. तुम्ही कितीही कष्ट केले तर हातात पैसा टिकत नाही, व्यावसायात अचानक मोठं नुकसान होतं, किंवा काहीतरी मोठं आर्थिक संकट येतं. घरात भांडणे होतात, आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. अशावेळी आपण अनेकदा आपल्या नशीबाला देष देतो. मात्र त्यासाठी केवळ नशीबच जबाबदार नसतं, तर तुमच्या घरात निर्माण झालेल्या वास्तुदोषांमुळे देखील या समस्या निर्माण होऊ शकतात. वास्तुदोष दूर करण्याचे अनेक उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार हवा, पाणी आणि अग्नी या गोष्टींची दिशा आधीपासूनच निश्चित आहेत. जर या गोष्टी तुमच्या घरात असतील आणि त्यांची जर दिशा चुकलेली असेल तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. आज आपण पाण्याची संबंधित वास्तु नियम जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात घरात कोणत्या दिशेला पाण्याची टाकी ठेवावी आणि कोणत्या दिशेला ठेवू नये?
पाण्याची टाकी या दिशेला ठेवू नये
वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या घरात ठेवलेल्या पाण्याच्या टाकीची दिशा योग्य नसेल तर तुमच्या आयुष्यात हळुहळु आर्थिक समस्या येण्यास सुरुवात होते. तसेच तुमच्या घरामध्ये आजारपण वाढते. वास्तुशास्त्रानुसार पाण्याची टाकी कधीही दक्षिण दिशेला किंवा दक्षिण -पश्चिम दिशेला कधीही ठेवू नये. त्यासोबतच पाण्याची टाकी दक्षिण पूर्व दिशेला देखील न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर या दिशेला पाण्याची टाकी ठेवली असेल तर घरात प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा तयार होते, याचा प्रभाव हा कुटुंबप्रमुखासह घरातील प्रत्येक सदस्यांवर होतो. त्यामुळे पाण्याची टाकी ठेवताना ती कधीही या दिशेला नसेल याची काळजी घेण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.
पाण्याची टाकी या दिशेला ठेवा
पाण्याची टाकी कोणत्या दिशेला ठेवू नये, हे जसं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे, त्याचप्रमाणे पाण्याची टाकी कोणत्या दिशेला ठेवणं हे शुभ आहे हे देखील सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार पाण्याची टाकी ही नेहमी उत्तर पूर्व दिशेला ठेवावी. यामुळे घरात सुख शांती राहते, समृद्धी येते. सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात, अशी वास्तुशास्त्रामध्ये मान्यता आहे. तुम्ही जर पाण्याची टाकी ही उत्तर पूर्व दिशेला ठेवली तर घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहते, असंही वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
