
2025 वर्ष संपण्यासाठी आता फक्त पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. बघता बघता अर्ध्याहून अधिक वर्ष सरून गेलं. लवकरच या वर्षाच्या अंतिम टप्प्यात दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण लागणार आहे. हे चंद्रग्रहण या वर्षी सप्टेंबर महिन्यात लागणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण असून भारतातून दिसणार आहे. त्यामुळे या चंद्रग्रहणाचं विशेष महत्त्व आहे. चंद्रग्रहण ही खगोलीय घटना असली तरी हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या घटनेकडे अनेक जण धार्मिक दृष्टीकोनातून पाहतात. त्यामुळे या कालावधीत सूतक काळ पाळण्याचं विधान आहे. सूतक कालावधी दरम्यान पूजा विधी आणि मंगळकार्य करण्यास मनाई असते. या वर्षीचं शेवटचं चंद्रग्रहण हे 7 सप्टेंबरला लागणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 58 मिनिटांनी ग्रहण सुरु होईल. तसेच 8 सप्टेंबरला रात्री 1 वाजून 26 मिनिटांनी ग्रहण संपेल. चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी हा 3 तास 28 मिनिटांचा असेल.
या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण हे भारतातून दिसणार आहे. त्यामुळे ग्रहणाचा सूतक काळ पाळावा लागणार आहे. चंद्रग्रहण सुरु होण्याच्या 9 तास आधी सूतक काळ सुरु होतो. म्हणजेच 7 सप्टेंबरला दुपासी 12 वाजून 19 मिनिटांनी सूतक पाळावं लागेल. हा सूतक काळ 8 सप्टेंबरला रात्री 1 वाजून 26 मिनिटांनी संपेल.
खगोलशास्त्रानुसार, पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा त्या स्थितीला चंद्रग्रहण असं म्हंटलं जातं. चंद्रग्रहण नेहमीच पौर्णिमेच्या दिवशी होते. हिंदू पंचांगानुसार, चंद्र पूर्ण असतो तेव्हा त्याला पौर्णिमा म्हणतात. चंद्रग्रहणाच्या वेळी, चंद्रावर पडणारा सूर्यप्रकाश पृथ्वीद्वारे रोखला जातो. त्यामुळे चंद्र दिसत नाही. या स्थितीला चंद्रग्रहण म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रग्रहण हे पौर्णिमेच्या दिवशीच होते. चंद्र हा कुंभ राशीत असणार असून या राशीत राहु आहे. त्यामुळे हे ग्रहण कुंभ राशीत असणार आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)