IND vs BAN : BCCI ला चॅलेंज करणाऱ्या बांग्लादेशची मस्ती उतरली, आता मनधरणीसाठी BCB कडून मैत्रीचे दाखले
IND vs BAN : भारतासोबत क्रिकेटमध्ये दुश्मनी कुठल्याही देशाला परवडत नाही. आता बांग्लादेशच्या बाबतीतही हेच झालय. BCCI सोबत दुश्मनी म्हणजे पैशाला मुकणं. आता बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला आपली ही चूक लक्षात आली आहे.

दोन वर्षांपूर्वी बांग्लादेशमध्ये सत्तांतर झालं. शेख हसीना यांना आसरा शोधण्यासाठी देशाबाहेर जावं लागलं. त्यानंतर भारत आणि बांग्लादेशचे राजकीय संबंध बिघडण्यास सुरुवात झाली. याचा परिणाम पुढे क्रिकेट संबंधांवरही झाला. पाकिस्तानच्या नादाला लागून बांग्लादेशने भारतात टी20 वर्ल्ड कपसाठी संघ पाठवण्यास नकार दिला. आयसीसीने देखील आपली भूमिका कायम ठेवली. अखेर बांग्लादेशची टीम या वर्ल्ड कपमध्ये खेळली नाही. पाकिस्तानचा संघ मात्र वर्ल्ड कप मध्ये होता. मागच्या अनेक महिन्यांपासून भारत-बांग्लादेश क्रिकेट संबंधात वादविवाद सुरु आहेत. दोन्ही देशांच्या बोर्डांमध्ये तणाव आहे. आता बांग्लादेशचे माजी कर्णधार आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष तमीम इकबाल यांनी मैत्रीपूर्ण स्टेटमेंट करुन वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आणि बीसीबी यांच्यात आता कुठला मोठा मुद्दा उरलेला नाही. भारताचा बांग्लादेश दौरा दोन्ही देशांच्या संबंधांना नवीन दिशा देऊ शकतो. भारताची टीम ऑगस्ट 2025 मध्ये बांग्लादेश दौऱ्यावर जाणार होती. तिथे ते वनडे आणि T20 सीरीज होणार होती. पण त्यावेळी दोन्ही देशातील वाढत्या राजकीय तणावामुळे हा दौरा रद्द करण्यात आला. सप्टेंबर 2026 मध्ये हा दौरा शिफ्ट करण्यात आला.
टी20 वर्ल्ड कपमधून माघार
बांग्लादेशात हिंदुंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरु होते. त्यामुळे भारतात बांग्लादेश विरोधात संताप वाढत होता. परिणामी बीसीसीआयच्या सूचनेवरुन इंडियन प्रीमियर लीग मधील फ्रेंचायजी कोलकाता नाइट रायडर्सने मुस्ताफिजुर रहमानला आपल्या स्क्वॉडमधून बाहेर केलं. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला ही गोष्ट पटली नाही. त्यांनी खेळाडूंच्या सुरक्षेचं कारण पुढे करत आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कप 2026 मधून माघार घेतली. आता बांग्लादेशमध्ये मोहम्मद युनूस यांचं सरकार जाऊन नवीन सरकार सत्तेवर आलं आहे. त्यामुळे टीम इंडिया सप्टेंबर 2026 मध्ये बांग्लादेश दौऱ्यावर जाऊ शकते.
टीम इंडियाच्या सुरक्षेचं काय?
तमीम इक्बाल इंडियन एक्सप्रेसशी बोलले. ते म्हणाले की, “बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष मिथुन मन्हास यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत. आम्ही दोघे एकत्र आयपीएलमध्ये क्रिकेट खेळलो आहोत. मिथुन सुद्धा अनेकदा ढाका लीगमध्ये खेळण्यासाठी बांग्लादेशला आला आहे” तमीम इक्बाल यांनी भारतीय टीमच्या सुरक्षेबद्दलही स्टेटमेंट केलं. “बांग्लादेशमध्ये भारतीय टीमच्या सुरक्षेला कुठलाही धोका नाही. भारतीय टीम बांग्लादेशला येते, तेव्हा संपूर्ण स्टेडियम भरुन जातं. लोकांना दोन्ही देशातले सामने खूप आवडतात. बीसीबी आणि बीसीसीआयमध्ये आता काही समस्या उरली आहे, असं मला वाटत नाही” असं तमीम इक्बाल म्हणाले.
