
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत टीम इंडिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे. भारताने साखळी फेरीत चांगली कामगिरी केली आणि सुपर 8 फेरीत जागा मिळवली आहे. पण भारताचं टेन्शन भलत्याच कारणामुळे वाढलं आहे. ते कारण म्हणजे ऐन स्पर्धेत ढासळलेला अभिषेक शर्माचा फॉर्म.. अभिषेक शर्मा या स्पर्धेत तीन सामन्यात खेळला आणि तिन्ही वेळेस शून्यावर बाद झाला. साखळी फेरीत त्याच्या चुकांवर पांघरून घातलं गेलं. पण या चुका सुपर 8 आणि बाद फेरीत चालणार नाहीत. कारण येथे एक चूक जेतेपदाचं स्वप्न भंग करणारं ठरेल. त्यामुळे टीम इंडिया व्यवस्थापनाला त्याची जागा संजू सॅमसनला देणं भाग असल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सलग तीन सामन्यात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू ठरला आहे. म्हणजेच टी20 क्रिकेटमधील नंबर 1 खेळाडू या स्पर्धेत एकही धाव करू शकलेला नाही. दुबळ्या नेदरलँडविरुद्धच्या सामन्यातही त्याला नशिबाने साथ दिली नाही.
अभिषेक शर्मा नेदरलँडचा गोलंदाज आर्यन दत्तच्या चेंडूवर पूल शॉट मारण्याच्या नादात चुकला आणि क्लिन बोल्ड झाला. पण असं असताना यावेळी अभिषेक शर्माच्या जर्सीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कारण अभिषेक शर्मा यावेळी मोहम्मद सिराजची जर्सी परिधान करून मैदानात उतरला होता. हार्षित राणा दुखापतग्रस्त झाल्याने टी20 वर्ल्डकप संघात एन्ट्री मिळाली होती. त्यामुळे त्याला नशिबाची साथ मिळाली. इतकंच काय तर मोहम्मद सिराजला पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत संधी मिळाली होती. तेव्हा त्याने चांगली कामगिरी केली. पण जसप्रीत बुमराह पुन्हा आल्याने आता सिराजला बेंचवर बसला आहे. पण त्याचं नशिब जोरदार आहे असं अभिषेक शर्माचं म्हणणं आहे. त्यामुळेच त्याच्या नशिबाची साथ घेण्यासाठी अभिषेक शर्मा सिराजचची जर्सी परिधान करून उतरला होता.
अभिषेक शर्माला एक कळलं पाहिजे की, धावा जर्सी बदलून येत नाही. त्यासाठी योग्य चेंडूंची निवड करून चांगले शॉट मारावे लागतात. अभिषेक शर्माने आतापर्यंत स्पर्धेत फक्त 8 चेंडू खेळले आहे. अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला होता. पाकिस्तानविरुद्ध 4 चेंडूंचा सामना करून, तर नेदरलँडविरूद्ध 3 चेंडूंचा सामना करून शून्यावर बाद झाला. अभिषेक शर्मा मागच्या 7 डावात पाचवेळा शून्यावर बाद झाला आहे. सलग शून्यावर बाद होण्याची मालिका पाहून क्रीडाप्रेमींचं टेन्शन वाढलं आहे. त्याच्या संजू सॅमसनला संधी देण्याची मागणी आता जोर धरत आहे.