
Arshdeep Singh And T20 World Cup : भारताने टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. न्यूझीलंड या अतिशय ताकदवान संघाला नमवत भारताने ही कमाल करून दाखवली आहे. या विजयानंतर संपूर्ण देशात मोठा उत्सव साजरा करण्यात आला. भारतीय खेळाडूंनीही आपल्या कुटुंबासोबत हा आनंद साजरा केला. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, भारताचा विजय झाल्याने देशातील सर्व क्रिकेटचे चाहते आणि खाळाडू आनंद साजरा करत आहेत. एकीकडे सगळे हा आनंद साजरा करत असताना मात्र दुसरीकडे भारताच्या एका खेळाडूला जबर धक्का बसला आहे. त्याच्याविरोधात आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. त्याला एक चूक चांगलीच महागात पडली आहे.
भारतीय संघातील गोलंदाज अर्शदीप सिंगविरोदात आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. रविवारी म्हणजेच आठ मार्च रोजी झालेल्या न्यूझीलंडविरोधातील सामन्यात त्याने नियमाचे उल्लंघन केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याने मोडलेला हा नियम प्रथम पातळीवरचे आहे, असे आयसीसीने म्हटले आहे. त्यामुळेच त्याच्या मॅचच्या फीपैकी 15 टक्के रक्कम त्याला आता दंड म्हणून भरावी लागणार आहे. अर्शदीपने मैदानावर आचारसंहितेतील अनुच्छेद 2.9 चे उल्लंघन केले असून चुकीच्या पद्धतीने व्यवहार केल्याचे आयसीसीने म्हटले आहे. सामना चालू असताना एखाद्या खेळाडूच्या दिशेने जोरात, चुकीच्या पद्धतीने चेंडू भिरकावल्यास काय करावाई करावी, याबाबत या अनुच्छेद 2.9 मध्ये माहिती देण्यात आलेली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना चालू असताना 11 व्या षटकात अर्शदीपकडून एक चूक झाली होती. त्याने या षटकात न्यूझीलंडचा खेळाडू डॅरिल मिचेल याच्या दिशेने जोरात चेंडू भिरकावला होता. हा चेंडू मिचेलच्या थेट पॅडवर लागला. पंचाच्या नजरेत अर्शदीपची ही कृती अनावश्यक आणि चुकीची होती. त्यामुळेच पंचांनी अर्शदीपच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. गेल्या 24 महिन्यांत अर्शदीपने हा पहिलाच गुन्हा केला होता. त्यामुळे कमीत कमी दंड ठोठावण्यात आला. लेव्हल एकचा गुन्हा असेल तर खेलाडूला त्याच्या मॅचच्या फीपैकी 50 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागते. अर्शदीपनेही ही कारवाई मान्य केली आहे.