IND vs PAK : सर्व काही स्पष्ट तरी फखर जमानच्या तोंडावर वाजले बारा, तुम्हीच सांगा आऊट होता की नाही

भारत पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना सुरु आहे. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर पाकिस्तानला पहिला धक्का बसला. फखर जमान मात्र बाद झाल्यानंतर नाराज झाला. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

IND vs PAK : सर्व काही स्पष्ट तरी फखर जमानच्या तोंडावर वाजले बारा, तुम्हीच सांगा आऊट होता की नाही
IND vs PAK : सर्व काही स्पष्ट तरी फखर जमानच्या तोंडावर वाजले बारा, तुम्हीच सांगा आऊट होता की नाही
Image Credit source: Twitter
| Updated on: Sep 21, 2025 | 8:54 PM

भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकात पाकिस्तानवर दबाव टाकण्याची संधी भारताकडे आली होती. पण अभिषेक शर्माने झेल सोडला आणि पाकिस्तानला बळ मिळालं. पण संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी आलेल्या हार्दिक पांड्याला खेळपट्टीचा अंदाज आला. त्याने त्यानुसार फखर जमानला स्लोअर आर्म चेंडू टाकला. त्यामुळे हा चेंडू खेळताना फखर जमान अडखळला. बॅटला चेंडू घासून थेट विकेटकीपर संजू सॅमसनच्या हाती गेला. फखरला माहिती होतं की बॅटला कट लागली आहे. त्यामुळे त्याचा चेहरा पडला होता. पण पंच संभ्रमात होते. त्यामुळे त्यांनी तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. यावेळी बॅटला चेंडू लागला की नाही हे सर्वात आधी तिसऱ्या पंचांनी तपासलं. तेव्हा त्याची कट लागल्याचं स्पष्ट झालं. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं.

संजू सॅमसनने झेल पकडला की नाही यावरून संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी घाई केली नाही. त्यांनी वारंवार वेगवेगळ्या अँगलने झेल तपासला. चेंडू ग्लव्ह्जमध्ये जाण्यापूर्वी जमिनीवर घासला की नाही यावरून चर्चा सुरु झाली. पण तिसऱ्या पंचांनी जवळून तपासल्यानंतर त्यांना स्पष्ट कळलं की चेंडू थेट ग्लव्ह्जमध्ये पडला आहे. त्यांनी क्षणाचाही विचार केला नाही. त्यांनी बाद असल्याचं घोषित केलं. पण फखर जमान मात्र यामुळे नाराज दिसला. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सर्व काही सांगत होते. इतकंच काय तर ड्रेसिंग रूमध्ये जाताना त्याने प्रशिक्षकाकडे तक्रार देखील केली. पण सर्वांना माहिती आहे की तो स्पष्ट बाद होता.

दरम्यान, पाकिस्तानने पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी केली. पाकिस्तानने 1 गडी गमवून 55 धावा केल्या. यावेळी भारताने दोन संधी गमावल्या. दोन्ही सोपे झेल सोडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे पाकिस्तानवरचा दबाव कमी झाला. हार्दिक पांड्या गोलंदाजीवर अभिषेक शर्माने झेल सोडला. त्यानंतर वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजी कुलदीप यादवने सोपा झेल सोडला. त्यामुळे भारतीय गोलंदाजावरील दडपण वाढलं.