Asia Cup 2025: टीम इंडियाचे 5 खेळाडू दुबईला जाणार नाहीत; बीसीसीआयचा मोठा निर्णय!
Indian Cricket Team : आशिया कप स्पर्धेला आता 2 आठवड्यांपेक्षा कमी कालावधी बाकी आहे. अशात बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 5 खेळाडूंना दुबईला जाता येणार नाही.

संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईमध्ये अवघ्या काही दिवसांनी आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 9 सप्टेंबरपासून आशिया कप स्पर्धेचा श्रीगणेशा होणार आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, ओमान आणि यूएई ए ग्रुपमध्ये आहेत. तर बी ग्रुपमध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँगचा समावेश आहे. आशिया कप स्पर्धेत सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे. सूर्यकुमार यादव कॅप्टन म्हणून पहिल्यांदाच आशिया कप स्पर्धेत खेळणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेसाठी सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात दुबईला रवाना होणार आहे. त्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे. बीसीसीआयने या स्पर्धेआधी एक मोठा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयचा निर्णय काय?
बीसीसीआयने 19 सप्टेंबरला आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. बीसीसीआयने मुख्य संघात 15 तर राखीव म्हणून 5 खेळाडूंना संधी दिली. यशस्वी जयस्वाल, प्रसिध कृष्णा, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल यांना राखीव म्हणून संधी दिली आहे. मुख्य संघातील खेळाडूला दुखापत झाल्यानंतरच राखीव खेळाडूंना संधी दिली जाते. बीसीसीआयने या राखीव खेळाडूंबाबत मोठा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे
बीसीसीआयने आशिया कप स्पर्धेसाठी मुख्य संघासह राखीव खेळाडूंना दुबईला न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राखीव खेळाडूंना मुख्य संघासह आशिया कप स्पर्धेसाठी दुबईत पाठवणार नसल्याची माहिती बीसीसीआय सिनिअर ऑफिशियलने पीटीआयला दिली. तसेच गरज लागेल तेव्हा राखीव खेळाडूंना दुबईला पाठवण्यात येईल.
टीम इंडिया दुबईला 4 सप्टेंबरला रवाना होणार!
आशिया कप स्पर्धेसाठी निवड झालेल्या भारतीय खेळाडूंना 4 सप्टेंबरपर्यंत दुबईला पोहचण्याचे आदेश बीसीसीआयने दिले आहेत. भारतीय संघ त्यानंतर 5 सप्टेंबरला दुबईतील आयसीसी अकॅडमीत सरावाला सुरुवात करणार आहे.
भारतीय संघाच्या साखळी फेरीती सामन्याचं वेळापत्रक
दरम्यान भारतीय संघाचा आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना हा 10 सप्टेंबरला होणार आहे. टीम इंडिया आपल्या सलामीच्या सामन्यात यूएई विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात 14 सप्टेंबरला पाकिस्तानला लोळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर तिसर्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडिया 19 सप्टेंबरला ओमान विरुद्ध 2 हात करणार आहे.
