AUS vs IND : मी की तु? शुबमन-अभिषेक यांच्यात चढाओढ! सूर्याने मालिका विजयानंतर काय सांगितलं? पाहा व्हीडिओ

Suryakumar Yadav on Abhishek Sharma and Shubman Gill : टीम इंडियाची युवा आणि स्टार ओपनिंग जोडी अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या दोघांमध्ये एका बाबतीत चढाओढ असल्याचं कॅप्टन सू्र्यकुमार यादव याने सांगितलंय. जाणून घ्या

AUS vs IND : मी की तु? शुबमन-अभिषेक यांच्यात चढाओढ! सूर्याने मालिका विजयानंतर काय सांगितलं? पाहा व्हीडिओ
Shubman Gill And Abhishek Sharma
Image Credit source: PTI
Updated on: Nov 08, 2025 | 9:25 PM

भारतीय क्रिकेट संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट गोड केला. टीम इंडियाने 5 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे भारताची विजयी हॅटट्रिकची संधी हुकली. मात्र भारताने त्याआधी सलग 2 सामने जिंकून मालिकेवर 1 हात आधीच ठेवला होता. तर पाचवा सामना रद्द करण्यात आल्याचं जाहीर होताच भारताने मालिका आपल्या नावावर केली. भारताने या विजयासह एकदिवसीय मालिकेतील पराभवाची परतफेड केली. भारताने या विजयासह 2008 पासून ऑस्ट्रेलियात टी 20I मालिका न गमावण्याची परंपरा यंदाही कायम राखली.

आगामी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा संयुक्तरित्या भारत आणि श्रीलंकेकडे आहे. भारतीय संघ टी 20I क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करतेय. तसेच अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या जोडीनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. शुबमनला गेल्या काही डावात टीकेचा सामना करावा लागला. मात्र शुबमनने पाचव्या टी 20I सामन्यात फटकेबाजी करत टीकाकारांना बॅटनेच उत्तर दिलं. अभिषेक आणि शुबमन या सलामी जोडीने 4.5 ओव्हर मध्ये 52 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली. मात्र त्यानंतर हवमान आणि पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. भारताने यासह मालिका आपल्या नावावर केली.

शुबमन-अभिषेकमध्ये चढाओढ

टीम इंडियाची सलामी जोडी अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांची या मालिकेत चर्चा पाहायला मिळाली. दोघांनीही मनसोक्त फटकेबाजी केली. कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिषेक आणि शुबमन यांच्यात एका बाबतीत चढाओढ असल्याचं सांगितलं.

पाचव्या सामन्यात 4.5 ओव्हरपर्यंत शुबमन गिल याने सर्वाधिक 29 तर अभिषेकने 23 धावा केल्या. दोघेही दोन्ही बाजूने फटकेबाजी करत होते. दोघांमध्ये एकाप्रकारे अर्धशतकासाठी चुरस पाहायला मिळत होती. यावरुनच दोघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत होती. सामन्यानंतर कॅप्टन सूर्याने या दोघांमध्ये कोणत्या मुद्यावरुन चढाओढ आहे? हे सांगितलं.

सूर्यकुमार यादव याने काय सांगितलं?

शुबमन आणि अभिषेक या दोघांमध्ये एकमेकांच्या स्ट्राईक रेटची बरोबरी करण्याबाबत चढाओढ असल्याचं सूर्याने सांगितलं. दोघांनी पाचव्या सामन्यात ज्या पद्धतीने फटकेबाजी केली. त्यावरुन सूर्याने सांगितलेला मुद्दा अधोरेखित होतो. शुबमनने खेळ थांबेपर्यंत 181 तर अभिषेकने 177 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.