आयपीएलमध्ये स्मार्ट सनग्लासेस वापरावर बंदी, बीसीसीआयने असं पाऊल उचलण्याचं कारण की…
BCCI bans smart sunglasses in IPL: आयपीएल 2026 स्पर्धेतील फक्त दोन सामन्यांचा खेळ शिल्लक आहे. असं असताना बीसीसीआयने आणखी एक नियम जाहीर केला आहे. यात आता प्लेयर्स अँड मॅच ऑफिशियल्स भागात स्मार्ट सनग्लासेस वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत यंदा काही कठोर नियम लादले गेले. काही घडामोडी घडल्याच्या चर्चेनंतर नियम कठोर केल्याचं बोललं जात आहे. आता स्पर्धा संपण्यासाठी फक्त दोन सामन्यांचा खेळ शिल्लक आहे. असं असताना बीसीसीआयने आणखी एक नियम जाहीर केला आहे. या नियमानुसार, आयपीएलमधील खेळाडूंना आणि मॅच अधिकाऱ्यांना स्मार्ट सनग्लासेस वापरण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. बीसीसीआयच्या अँटी करप्शन स्पष्ट केलं की, पीएमओए म्हणजे प्लेयर्स अँड मॅच ऑफिशियल्स भागात स्मार्ट सनग्लासेस वापरण्यावर पूर्णपणे बंदी असेल. इतकंच नाही तर बोर्डाच्या या नियमाचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. बीसीसीआयने या सनग्लासेस वापरासंदर्भात फ्रेंचायझींना एक सूचना दिली आहे. स्मार्ट सनग्लासेसमुळे सामन्याच्या सुरक्षेला आणि निष्पक्षतेला ठेच लागू शकते. कारण गॉगल्स लाईव्ह स्ट्रीमिंग, व्हिडीओ कॉलिंग, मोबाईल डेटा किंवा वायफायद्वारे संदेश पाठवू किंवा मिळवू शकतात.
मोबाईल आणि स्मार्ट सनग्लासेसही जमा करावे लागणार
बीसीसीआयने स्पष्ट केलं की, स्मार्ट सनग्लासेस ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंग उपकरणे आणि संवाद साधने या दोन्ही प्रकारात मोडतात. त्यामुळे स्मार्ट सनग्लासेसच्या वापरास बंदी घालण्यात आली आहे. आयपीएलची सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या दिशेने उचललेले आणखी एक ठोस पाऊल मानले जात आहे. आता आयपीएल संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला खेळाच्या मैदानात प्रवेश करताना त्यांचे मोबाईल फोन, स्मार्टवॉच आणि स्मार्ट सनग्लासेस सुरक्षा संपर्क अधिकाऱ्याकडे जमा करावे लागतील. तसे आदेश सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला दिले आहेत.
नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई
प्लेयर्स अँड मॅच ऑफिशियल्स भागात स्मार्ट सनग्लासेस वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी या निर्देशाचे उल्लंघन केले आणि आपले सनग्लासेस जमा केले नाहीत, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. आयपीएल आचारसंहितेनुसार शिक्षा केली जाईल, असा इशारा बीसीआयने दिला आहे. आयपीएल स्पर्धेच्या सुरूवातील राजस्थान रॉयल्सचे व्यवस्थापक रोमी भिंदर यांनी सामन्यादरम्यान डगआऊटमध्ये फोन वापरल्याने वाद निर्माण झाला होता. तेव्हा भिंदर यांना ताकीद देण्यात आली होती. इतकंच काय तर 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
