Mohammed Shami: मोहम्मद शमीचं वादळ घोंघावलं, चौकार-षटकार मारत ठोकलं वेगवान अर्धशतक

मोहम्मद शमीला सध्या टीम इंडियात स्थान मिळणं कठीण झालं आहे. पण मोहम्मद शमीने काही माघार घेतलेली नाही. देशांतर्ग्त क्रिकेटमध्ये आपली क्षमता सिद्ध करून दाखवत आहे. रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने वादळी अर्धशतक ठोकलं.

Mohammed Shami: मोहम्मद शमीचं वादळ घोंघावलं, चौकार-षटकार मारत ठोकलं वेगवान अर्धशतक
मोहम्मद शमीचं वादळ घोंघावलं, चौकार-षटकार मारत ठोकलं वेगनाव अर्धशतक
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 09, 2026 | 7:17 PM

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू आहेत. या स्पर्धेत आंध्र प्रदेश आणि बंगाल हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात बंगालने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात आंध्र प्रदेशला 295 धावांवर रोखलं. त्यानंतर बंगालने जोरदार प्रहार केला. यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची फलंदाजीची बाजू पाहता आली. त्याने आक्रमण करून आंध्र प्रदेशच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. बंगालने पहिल्या डावात 629 धावांची खेळी केली. तसेच यात सुदिप कुमार घरामीने 299 केल्या. त्याचं त्रिशतक फक्त एका धावेने हुकलं. तर शाकिर हबीब गांधीने 95 धावा केल्या. तर मोहम्मद शमीच्या अर्धशतकाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मोहम्मद शमीने शेवटच्या विकेटसाठी मुकेश कुमारसह 55 धावांची भागीदारी केली. त्यांच्या भागीदारीमुळे संघाच्या धावा 600च्या पार नेण्यास मदत झाली.

संघाची स्थिती मजबूत असताना मोहम्मद शमी दहाव्या स्थानावर फलंदाजीला उतरला होता. मोहम्मद शमी आला आणि आक्रमण सुरू केलं. त्याने फक्त 33 चेंडूत 53 धाव केल्या. त्याने फक्त 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यात त्याने 7 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट हा 160हून अधिक होता. त्याने 46 धावा या चौकार आणि षटकार मारून केल्या. हा सामना पाहण्यासाठी निवड समिती सदस्य आरपी सिंह उपस्थित होता. त्यामुळे निवड समितीला त्याला डावलण्याचं कारण मिळणार नाही. एक शॉट शमीने आरपी सिंहच्या दिशेने मारला. तेव्हा सीमेरेषेवर बसलेल्या आरपी सिंहला चेंडू पकडण्यासाठी धावावं लागलं. दुसरीकडे, पहिल्या डावात गोलंदाजीत शमी काही खास करू शकला नाही. त्याने 17 षटकात 38 धावा दिल्या आणि 1 विकेट काढली.

आता टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरू आहे. त्यानंतर आयपीएल स्पर्धा असेल. त्यामुळे मे महिन्यापर्यंत तसं काहीच नाही. त्यानंतर जुलै महिन्यात भारताचा श्रीलंका दौरा आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. या मालिकेसाठी मोहम्मद शमीचा विचार केला जाऊ शकतो. पण त्यासाठी त्याला आयपीएलमध्येही चमक दाखवावी लागेल.