
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्याआधीपासूनच वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष लागून होतं. कारण त्याचा फॉर्म पाहता चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण सुरूवातीच्या काही सामन्यात त्याला अनुरूप अशी फलंदाजी झाली नाही. लीग आणि उपांत्य फेरीत त्याने चांगली सुरूवात केली. पण त्याचं रूपांतर काही शतकात करू शकला नाही. त्यामुळे अंतिम सामन्यातही तसाच खेळेल असं वाटलं होतं. पण वैभव सूर्यवंशीने सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवले. वैभव सूर्यवंशी इंग्लंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याच्यासाठी आखलेली प्रत्येक रणनिती फेल गेली. समोर जो गोलंदाज येईल त्याला त्याने फोडून काढला. इंग्लंडचे गोलंदाज तर पुरते हतबल झाले होते. अचानक त्याच्या कामगिरीत बदल झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण या मागचं खरं कारण समोर आलं आहे. मनीष ओझाने सांगितलं की, अंतिम फेरीपूर्वी वैभव सूर्यवंशीला फोन केला होता. त्याच्या डोक्यात अडचण होती. त्यामुळे आखुड टप्प्याच्या चेंडूवर बाद होत होता.
वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, वैभवला फोन केला होता आणि आखुड टप्प्याचा चेंडू खेळण्यासाठी येणारी अडचण समजून सांगितली. त्याचं डोकं हा चेंडू खेळतात बरोबर स्थितीत येत नव्हतं. हा फटका मारताना त्याचं डोकं वारंवार मागे जात होतं. ही चूक त्याच्या लक्षात आणून दिली. डोकं चेंडूच्या स्थितीत आलं तर नक्कीच अचूक फटका मारशील असं सांगितलं. वेळ असेल तर सराव कर. आखुड टप्प्याचा चेंडू सोडू नको उलट त्याच्या स्थितीत ये आणि फटका मार. वैभव सूर्यवंशीने प्रशिक्षक मनीष ओझा यांचं म्हणणं ऐकलं आणि झालंही तसंच. त्याने त्यावर मेहनत घेतली आणि अंतिम फेरीत त्याचं चांगलं फळ मिळालं.
वैभव सूर्यवंशीने 80 चेंडूत 15 चौकार आणि 15 षटकार मारत 175 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 218.75 चा होता. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाने 411 धावांपर्यंत मजल मारली. खरं तर इतक्या धावा झाल्या नसत्या तर चित्र काही वेगळं असतं. कारण इंग्लंडने या धावांचा पाठलाग करताना 311 धावांपर्यंत मजल मारली. हा सामना इंग्लंडने 100 धावांनी गमावला. त्यामुळे वैभव सूर्यवंशीची खेळी किती महत्त्वाची होती हे दिसून येते.