ENG vs IND : टीम इंडियाची ‘सुंदर’ बॉलिंग, इंग्लंडला गुंडाळलं, लॉर्ड्समध्ये विजयासाठी 193 धावांचं आव्हान

England vs India 3rd Test Match Day 4 : टीम इंडियाचे गोलंदाज इंग्लंडला 200 धावांच्या आत रोखण्यात यशस्वी ठरले. फिरकी आणि वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडला दुसऱ्या डावात 192 धावांवर रोखलं.

ENG vs IND : टीम इंडियाची सुंदर बॉलिंग, इंग्लंडला गुंडाळलं, लॉर्ड्समध्ये विजयासाठी 193 धावांचं आव्हान
Washington Sundar Team India
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Jul 13, 2025 | 9:59 PM

इंग्लंडने टीम इंडियासमोर तिसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी विजयासाठी 193 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दोन्ही संघांनी पहिल्या डावात बरोबरी साधली. इंग्लंडने ऑलआऊट 387 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियानेही 387 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडवर दुसर्‍या डावात मोठी धावसंख्या करुन टीम इंडियाला तगडं आव्हान देण्याचा दबाव होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे इंग्लंडला 200 पारही पोहचता आलं नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये दुसऱ्या डावात 62.1 ओव्हरमध्ये 192 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे भारताला 193 धावांचं लक्ष्य मिळालं. आता हे आव्हान पूर्ण करण्यासाठी भारताकडे 100 पेक्षा अधिक षटकं आहेत. अशात टीम इंडिया हा सामना किती विकेट्सने जिंकते? याकडे आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

इंग्लंडचा दुसरा डाव

टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडकडून एकालाही अर्धशतक करता आलं नाही. इंग्लंडसाठी सर्वात अनुभवी फलंदाज जो रुट याने सर्वाधिक 40 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त एकालाही 35 पार मजल मारता आली नाही. कर्णधार बेन स्टोक्स याने 33 धावांची खेळी केली. हॅरी ब्रूक याने 23 धावा जोडल्या. ओपनर झॅक क्रॉलीने 22 रन्स केल्या. बेन डकेट याने 12 तर ख्रिस वोक्सने 10 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना दुहेरी आकड्यापर्यंतही पोहचता आलं नाही.

टीम इंडियाकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी रवींद्र जडेजाचा अपवाद वगळता सर्वांना विकेट मिळाली. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर याने कमाल केली. सुंदरने नावाप्रमाणे सुंदर कामगिरी केली. सुंदरने 12.1 ओव्हरमध्ये 22 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या जोडीने प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर नितीश कुमार रेड्डी आणि आकाश दीप या दोघांनी इंग्लंडच्या 1-1 खेळाडूला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

गोलंदांजांची सुंदर कामगिरी, आता फलंदाजांवर मदार

टीम इंडिया सलग दुसरा विजय मिळवणार?

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील 5 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. इंग्लंडने लीड्समध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियावर 5 विकेट्सने मात करत विजय सलामी दिली. त्यानंतर बर्मिंगहॅममध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने पलटवार केला आणि 336 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे आता टीम इंडियाला लॉर्ड्समध्ये इंग्लंडवर मात करत सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी आहे.