ENG vs IND : ऐतिहासिक, श्रेयस इंग्लंड विरुद्ध अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, नक्की काय केलं?
Shreyas Iyer England vs India : इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील पहिल्या टी 20i सामन्याचा निकाल पावसामुळे लागला नाही. मात्र भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर याने इंग्लंड विरुद्ध अर्धशतक झळकावून ऐतिहासिक कामगिरी केली.

श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात टीम इंडियाची टी 20i क्रिकेटमध्ये पहिल्या विजयाची प्रतिक्षा अजूनही कायम आहे. आयर्लंड विरूद्धच्या क्लिन स्वीपच्या पराभवानंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध विजयी सलामी देईल, अशी आशा भारतीय चाहत्यांनी होती. मात्र पावसामुळे तसं झालं नाही. उभयसंघात 1 जुलैला झालेला पहिला टी 20i सामना हा पावसामुळे रद्द झाला. चेस्टर ली स्ट्रीटमध्ये आयोजित या सामन्यात पावसामुळे दुसऱ्या डावाचा खेळ झाला नाही. पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. टीम इंडियाने टॉस जिंकून या सामन्यात बॅटिंग केली. भारताने कर्णधार श्रेयस अय्यर याच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 189 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 190 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र पावसामुळे दुसऱ्या डावातील खेळच झाला नाही. त्यामुळे सामना रद्द करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं.
भारतासाठी या सामन्यात 3 फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या. ऑलराउंडर शिवम दुबे याने 21 बॉलमध्ये नॉट आऊट 42 रन्स करत फिनिशिंग टच दिला. ओपनर अभिषेक शर्मा याने 24 बॉलमध्ये 59 रन्स केल्या. तर कर्णधार श्रेयसने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. श्रेयसने 47 बॉलमध्ये 68 रन्स केल्या. श्रेयसने या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. श्रेयसने या दरम्यान अर्धशतक लगावताच ऐतिहासिक कामगिरी केली.
श्रेयस पहिलाच कर्णधार
श्रेयस इंग्लंडमध्ये इंग्लंड विरुद्ध टी 20i अर्धशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला. तसेच श्रेयसचं टी 20i कर्णधार म्हणूनही हे पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं.
श्रेयसआधी टीम इंडियाचं टी 20i क्रिकेटमध्ये एकूण 14 खेळाडूंनी नेतृत्व केलं. मात्र त्यापैकी काहींना इंग्लंडमध्ये नेतृत्वाची संधी मिळाली नाही. तर ज्यांना इंग्लंडमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली तेही अर्धशतक करण्यात अपयशी ठरले. विराट कोहली याने इंग्लंडमध्ये 2018 साली भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक 47 धावांची खेळी केली होती. मात्र आता 9 वर्षांनी श्रेयसने विराटचा विक्रम मोडीत काढून इंग्लंडमध्ये अर्धशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार हा बहुमान मिळवला.
दुसरा सामना कधी?
दरम्यान इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील दुसरा टी 20i सामना हा शनिवारी 4 जुलैला होणार आहे. या सामन्यात भारताचे फलंदाज मोठी धावसंख्या करण्यात सातत्य राखणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.