RCB vs GT: आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुजरात आरसीबी असेच पोहोचले नाहीत, असा आहे 5 वर्षांचा रेकॉर्ड
आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होत आहे. दोन्ही संघ जेतेपदासाठी लढत देणार आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. पण हे दोन संघ अंतिम फेरीत असेच पोहोचले नाहीत. मागच्या पाच वर्षातील रेकॉर्ड वाचा

आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्ग बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना 31 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. या दोन्ही संघांनी साखळी फेरीत चांगली कामगिरी केली आहे. 14 पैकी 9 सामन्यात विजय मिळवला आणि 18 गुणांची कमाई केली होती. पण नेट रनरेटच्या बाबतीत आरसीबी संघ वरचढ ठरला. या दोन्ही संघांनी क्वॉलिफायर 1 मध्ये लढत दिली होती. आरसीबीने क्वॉलिफायर 1 लढतीत गुजरात टायटन्सला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर गुजरात टायटन्सने क्वॉलिफायर 2 मध्ये राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं आणि अंतिम फेरी गाठली आहे. पण अंतिम फेरी गाठलेल्या दोन्ही संघांची मागच्या पाच वर्षातील कामगिरी उल्लेखनीय आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे यशस्वी संघ आहेत. त्यामुळेच या दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली आहे.
आयपीएल स्पर्धेत दोन्ही संघ 2022 पासून सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढत गेला आणि रणनितीत सुधारणा होत गेली. आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सने 2022 मध्ये एन्ट्री मारली. तेव्हापासून गुजरात टायटन्सने 76 सामने खेळले आहे. त्यापैकी 47 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 29 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सची विजयी टक्केवारी ही 61.8 टक्के आहे. गुजरात टायटन्सने पाच पैकी 4 पर्वात प्लेऑफमध्ये एन्ट्री मारली आहे. तर तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.
आयपीएल 2022 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची आकडेवारीही तसंच काहीसं सांगत आहे. आरसीबीने 76 सामने खेळले त्यापैकी 44 सामन्यात विजय मिळवला. तर 31 सामने गमावले आहेत. आरसीबीची विजयी टक्केवारी ही 57.8 टक्के आहे. आरसीबीने पाच पैकी 4 हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. तर सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे दोन्ही संघाची विजयी टक्केवारी बरंच काही सांगून जात आहे. या आकडेवारीवरून दोन संघ पाच वर्षातील यशस्वी संघ आहेत. आता जेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते? हे पाहणं औत्सुक्याचं आहे.