मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर हार्दिक पांड्या हसतो कसा? माजी क्रिकेटपटूच्या तळपायाची आग मस्तकात
राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला पराभवाची धूळ चारली आहे. या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पराभूत केलं. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित किचकट झालं आहे. असं असूनही मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या प्रत्येक प्रश्नांची हसत हसत उत्तरं देत होता. त्यामुळे माजी क्रिकेटपटूने अप्रत्यक्षरित्या टीकास्त्र सोडलं आहे.
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सला पाचव्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. राजस्थान रॉयल्सने 8 चेंडू आणि 9 गडी राखून मुंबई इंडियन्सचा पराभव केला. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचा प्लेऑफचा मार्ग आणखी कठीण झाला आहे. गुणतालिकेत मुंबई इंडियन्स संघ सातव्या स्थानावर आहे, तर राजस्थान रॉयल्स संघ पहिल्या स्थानी आहे. राजस्थान रॉयल्सने आणखी एक विजय मिळवला तर प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल. दुसरीकडे, या सामन्यातील पराभवानंतर हार्दिक पांड्याचं वक्तव्य ऐकून दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने नाराजी व्यक्त केली आहे. आयपीएलमध्ये विजय किंवा पराजय झाल्यानंतर कर्णधार हाताचं राखून बोलत असल्याचं दिसून येत आहे. इतकंच काय तर स्टेनने एक्सवरून अप्रत्यक्षरित्या हार्दिक पांड्यावर टीकास्त्र सोडलं आहे. हार्दिक पांड्याने सामन्यानंतर हसत सांगितलं होतं की, ” खेळाडूंवर टीका करण्याची ही वेळ नाही. कारण संघात सर्वच व्यवसायिक आहेत.” या वक्तव्यानंतर डेल स्टेन तळपायाची आग मस्तकात गेली आहे.
डेल स्टेनने आपल्या एक्स अकाउंटवरून विनंती करत लिहिलं आहे की, “माझे लक्ष त्या दिवसांवर आहे, जेव्हा खेळाडू त्यांच्या मनात काय आहे ते प्रामाणिकपणे सांगतील. सध्या आपण सुरक्षित गोष्टी सांगून स्वतःला आणि आपल्या मेंदूला मूर्ख बनवत आहोत. पुढचा सामना हरतो, हसतो आणि मग तोच मूर्खपणा पुन्हा करतो.” डेल स्टेनने अप्रत्यक्षरित्या ही टीका केली आहे.
I really look forward to the day players might say what’s honestly on their mind. Instead we some how dumbed ourselves and our minds into saying the usual safe thing, lose the next game, smile and then repeat that nonsense again. 🙄
PS. Qdk, I love you
— Dale Steyn (@DaleSteyn62) April 22, 2024
अष्टपैलू हार्दिक पांड्या सर्वच स्तरावर अपयशी ठरताना दिसत आहे. कर्णधाराची धुरा खांद्यावर असताना फलंदाजी आणि गोलंदाजी काही खास करताना दिसत नाही. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने 10 चेंडूत 10 धावा केल्या. तसेच सामन्यात फक्त दोन षटकं टाकत एकही विकेट न घेता 21 धावा दिल्या. दुसरीकडे, 180 धावांचं लक्ष्य देऊनही मुंबई इंडियन्सला 9 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर सोशल मीडियावर फॅन्सनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई इंडियन्सचे स्पर्धेत आणखी सहा सामने शिल्लक आहे. सध्या मुंबई इंडियन्स 6 गुणांसह सातव्या स्थानी आहे. त्यामुळे उर्वरित सहा सामने जिंकून 18 गुण करण्याची संधी आहे. जर एखाद्या सामन्यात पराभव झाला तर मुंबई इंडियन्सचं कठीण होईल. मग काहीही करून पाच सामने जिंकावेच लागतील.