
आयपीएल 2025 क्वालिफायर-2 सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. श्रेयस अय्यर याने केलेल्या स्फोटक खेळीच्या जोरावर पंजाबने 204 धावांचं आव्हान हे 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. आता पंजाब अंतिम फेरीत आयपीएल ट्रॉफीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध भिडणार आहे. तर मुंबईचं पराभवासह आव्हान संपुष्ठात आलं. मुंबईच्या या पराभवानंतर हार्दिक पंड्या याने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या पोस्टबाबत नक्की सत्यता काय? हे जाणून घेऊयात.
मुंबईने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 200 पेक्षा अधिक धावा केल्या. मुंबईने आयपीएल इतिहासात आतापर्यंत प्रत्येक वेळेस 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी बचाव केला. त्यामुळे मुंबई पंजाबवर मात करत अंतिम फेरीत पोहचेल, असा विश्वास चाहत्यांना होता. मात्र श्रेयस अय्यर आणि नेहल वढेरा या जोडीने केलेल्या खेळीमुळे मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब या विजयासह मुंबई विरुद्ध आयपीएल इतिहासात 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणारी पहिली टीम ठरली. कर्णधार श्रेयस याने नाबाद 87 धावांची खेळी केली. तर नेहल वढेरा याने 48 धावा जोडल्या.
हार्दिक पंड्या याने मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे, अशी पोस्ट Tata IPL 2025 Commentary या एक्स हँडलवरुन 2 जून रोजी मध्यरात्री 1 वाजून 58 मिनिटांनी करण्यात आली. या एक्स हँडलचे 42 हजारांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. तसेच हे खातं अधिकृत अर्थात ब्लू टिक आहे. त्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांना हार्दिकने कर्णधारपदाचा राजीनामा दिला, हे खरं वाटलं. मात्र तसं काहीच नाही. हार्दिकने कर्णधारपदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे हे वृत्त खोटं आहे.
दरम्यान मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात आयपीएल 2025 मधील साखळी फेरीत 14 पैकी 8 सामने जिंकून पहिल्यांदाच क्वालिफायरमध्ये प्रवेश केला. तसेच एलिमिनेटरमध्ये मुंबईने गुजरात टायटन्सवर मात करत क्वालिफायर-2 मध्ये धडक दिली. मात्र पंजाबने मुंबईला रोखत फायनलचं तिकीट मिळवलं.
हार्दिकच्या राजीनाम्याचं खोटं ट्विट
🚨 Hardik Pandya resigned from the captaincy of Mumbai Indians. 💔#PBKSvsMI #MIvsPBKS #IPLPlayoffs pic.twitter.com/5vNUAytcSL
— Tata IPL 2025 Commentary (@IPL2025Auction) June 1, 2025
दरम्यान हार्दिकने 18 व्या हंगामातील 15 सामन्यांमध्ये एकूण 224 धावा केल्या. तर 14 विकेट्सही घेतल्या. हार्दिकने या मोसमात 36 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. हार्दिकची त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.