
आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर इथेच गणित चुकलं. इशान किशनचं वादळ घोंघावलं आणि सामन्याचं चित्र बदललं. इशान किशनच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकात 7 गडी गमवून 175 धावा केल्या आणि विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना पाकिस्तानने 114 धावांवरच नांगी टाकली. भारताने हा सामना जिंकला आणि सुपर 8 फेरीतील स्थान पक्कं केलं. पण या पराभवाने पाकिस्तानची वाट बिकट झाली आहे. पाकिस्तानला आता चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात काहीही करून विजय मिळवावाच लागेल. कारण पराभूत झाल्यानंतर नेट रनरेट काही सुधारणार नाही. त्यामुळे अमेरिकेला सुपर 8 फेरीत जागा मिळेल. सध्या गुणतालिकेची स्थिती पाहता तसंच गणित आहे.
भारत पाकिस्तान सामना होण्यापूर्वी पाकिस्तानचा संघ चांगल्या स्थितीत होता. गुणतालिकेत अधिक नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर होता. पण भारताने 61 धावांनी पराभूत करतात गुणतालिकेत मोठा बदल झाला. पाकिस्तानची थेट दुसऱ्या स्थानावर तिसऱ्या स्थानावर घसरण झाली. इतकंच काय तर नेट रनरेट हा -0.403 इतका झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानला आता सुपर 8 फेरीत जागा मिळवायची असेल तर नामिबियाला पराभूत करणं गरजेचं आहे. कारण अमेरिका दुसऱ्या स्थानावर असून 4 गुण आणि नेट रनरेट हा +0.787 इतका आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला असून 6 गुण आणि +3.050 नेट रनरेट आहे. तर सुपर 8 फेरीत स्थान पक्कं केलं आहे.
भारताचा शेवटचा सामना नेदरलँडशी होणार आहे. या सामन्याचा तसा काही गुणतालिकेवर फरक पडणार नाही. हा सामना नेदरलँड तर जिंकणार नाही. कारण भारताचा फॉर्म पाहता तसं होणं शक्य नाही. पण समजा तसं झालं आणि नेदरलँड जिंकला तर नेट रनरेटचं गणित काही सुटणार नाही. त्यामुळे सुपर 8 फेरीसाठी अमेरिका आणि पाकिस्तान या दोन संघांना संधी आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि नामिबिया सामना करो या मरोची स्थिती आहे. पाकिस्तानने हा सामना गमावला तर अमेरिका थेट सुपर 8 फेरीत जागा पक्की करेल. त्यामुळे आता पाकिस्तान नामिबिया सामन्याचं महत्त्व वाढलं आहे.