T20 World Cup 2021 पूर्वी इशान पुन्हा फॉर्ममध्ये, तुफान खेळीमागे ‘या’ खेळाडूंचा सल्ला
आय़पीएलच्या यंदाच्या हंगामातील 51 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर 8 गडी राखून विजय मिळवला. या विजयामध्ये युवा फलंदाज इशान किशनचं अर्धशतक महत्त्वाचं ठरलं.
मुंबई: आयपीएलच्या 14 व्या पर्वात मंगळवारी (5 ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स (RR vs MI) या दोन संघामध्ये आय़पीएलचा 51 वा सामना पार पडला. सामन्यात मुंबईने विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान जीवंत ठेवले. मुंबईच्या चाहत्यांसाठी या आनंदाच्या गोष्टीसह भारतीय क्रिकेटप्रेमींना आनंदाची गोष्ट म्हणजे टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2021) संघात असलेला युवा खेळाडू इशान किशन (Ishan Kishan) हाही पुन्हा फॉर्ममध्ये आला. सामन्यात धडाकेबाज अर्धशतक ठोकत इशानने मुंबईला एकहाती विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे त्याच्या या खेळीमागे काही वरिष्ठ खेळाडूंचा सल्ला कामी आल्याचं त्याने स्वत: सांगितलं.
सामन्यानंतर बोलताना इशानने त्याच्या या तुफान खेळीमागे विराट कोहली, हार्दीक पंड्या आणि कायरन पोलार्ड यांचा सल्ला कामी आल्याचं सांगितलं. इशानसाठी यंदाची आयपीएल हवी तितकी खास जात नव्हती. त्याने 8 सामन्यात 107 धावाचं केल्या होत्या. त्यामुळे तो काही सामने बाहेरही होता. पण याच दरम्यान विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि कायरन पोलार्ड यांची त्याला खुप मोठी मदत झाली. त्यांनी दिलेला सल्ला त्याला उपयोगी पडला. गेल्या काही सामन्यातील स्वत:ची फलंदाजी पाहिल्यानंतर इशानला त्याच्या चूका कळाल्या. त्या सुधारत त्याने राजस्थानविरुद्ध तुफान फलंदाजी केली.
इशानचं धडाकेबाज अर्धशतक आणि मुंबई विजयी
91 धावांचं सोपं लक्ष्य पार करताना मुंबईचा सलामीवीर कर्णधार रोहितने चांगली सुरुवात केली. पण 22 धावा होताच चेतन सकारियाने त्याला बाद केलं. त्यानंतर सूर्यकुमारही 13 धावा करुन बाद झाला. मुस्तफिजूरने त्याची विकेट घेतली. पण सलामीवीर इशान किशन मात्र एका बाजूने तुफानी फलंदाजी करतच होता. त्याने अवघ्या 25 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार ठोकत 50 धावा केल्या आणि सोबतच मुंबईला अवघ्या 8.2 ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला.
चौथ्या स्थानासाछी केकेआर आणि मुंबईत चुरस
सध्या केकेआर आणि मुंबई दोघांनी 13 पैकी 6 सामने जिंकत 12 गुण मिळवले आहेत. पण केकेआरचा नेट रनरेट +0.294 असून मुंबईचा -0.048 इतका आहे. त्यामुळे केकेआर चौथ्या आणि मुंबई पाचव्या स्थानावर आहे. यामुळेच दोन्ही संघाचा अखेरचा सामना अत्यंत महत्त्वाचा असून केकेआरचा सामना गुरुवारी राजस्थान रॉयल्ससोबत तर मुंबईचा शुक्रवारी सनरायजर्स हैद्राबादसोबत होणार आहे.
हे ही वाचा
(In RR vs MI match behind Ishan Kishans Smashing hald century there is Virat, Pollard and pandyas suggestion)