
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप विजयानंतर देशभरात आनंदाचं वातावरण आहे. भारताने वर्ल्ड कप जिंकून अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले. भारत न्यूझीलंडला पराभूत करुन सलग 2 आणि एकूण 3 वर्ल्ड कप जिंकणारा पहिलाच संघ ठरला. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ही कामगिरी करुन दाखवली.या ऐतिहासिक विजयानंतर आयसीसी आणि बीसीसीआयकडून कोटींमध्ये बक्षिस रक्कम देण्यात आली. खेळाडूंचं जोरदार स्वागत करण्यात आलं. आता त्यानंतर टीम इंडिया या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आपली पुढील टी 20I मालिका केव्हा खेळणार? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
टीम इंडियाचे खेळाडू वर्ल्ड कप विजयानंतर सध्या विश्रांती करत आहे. त्यानंतर आयपीएल स्पर्धेचा थरार रंगणार आहे. आयपीएल स्पर्धा 28 मार्च ते जवळपास संपूर्ण मे महिना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया जून महिन्यात टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पहिली आंतरराष्ट्रीय मालिका अफगाणिस्तान विरुद्ध खेळणार आहे. उभयसंघात पहिल्यांदाच एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. तर अफगाणिस्तानच्या या भारत दौऱ्याची सांगता ही एकमेव कसोटी सामन्याने होणार आहे. मात्र आपण वर्ल्ड कप स्पर्धेनंतर होणाऱ्या पहिल्याच टी 20I मालिकेबाबत जाणून घेणार आहोत.
टीम इंडिया वर्ल्ड कप विजयानंतर इंग्लंड विरुद्ध पहिली टी 20I मालिका खेळणार आहे. टीम इंडिया या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात 1 ते 19 जुलै दरम्यान टी 20I आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा नियमित टी 20i कर्णधार आहे. या हिशोबाने सूर्यकुमार यादव हाच इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.
टीम इंडिया इंग्लंड दौऱ्याची सुरुवात टी 20I मालिकेने करेल. या मालिकेत एकूण 5 टी 20I सामने खेळवण्यात येणार आहे.
पहिला सामना, 1 जुलै, चेस्टर ली स्ट्रीट.
दुसरा सामना, 4 जुलै, मँचेस्टर.
तिसरा सामना, 7 जुलै, नॉटिंघम.
चौथा सामना, 9 जुलै, ब्रिस्टोल.
पाचवा सामना, 11 जुलै, साऊथम्पटन.
उभयसंघात 1 ते 11 जुलै दरम्यान टी 20I मालिका खेळवण्यात येईल. त्यानंतर उभयसंघात 14 ते 19 जुलै दरम्यान 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगेल. या मालिकेत शुबमन गिल नेतृत्व करेल. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे खेळताना दिसतील.