
टीम इंडिया गुवाहाटी कसोटीत पराभवाच्या छायेत आहे. दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 288 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसरा डाव हा 5 बाद 260 धावांवर घोषित केला. त्यामुळे भारताला 549 धावांचं आव्हान मिळालं. भारताची दुसऱ्या डावात विजयी धावांचा पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात राहिली. दक्षिण आफ्रिकेने भारताला दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 झटके दिले. भारताने 2 विकेट्स गमावून 27 धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी पाचव्या दिवशी 90 ओव्हरमध्ये आणखी 522 धावांची गरज आहे. तर दक्षिण आफ्रिकेला भारताला 2-0 ने व्हाईटवॉश करण्यासाठी 8 विकेट्स हव्या आहेत.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही संघाने 500 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग केलेला नाही. त्यामुळे भारताला विजय मिळवण्यासाठी इतिहास घडवावा लागेल. मात्र ते इतकं सोपं नसणार. तसेच भारताने हा सामना अनिर्णित राखला तरीही मालिका पराभव निश्चित आहे. कारण दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 489 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने भारताला 201 धावांवर गुंडाळलं. भारतासाठी पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल याने सर्वाधिक केल्या. दक्षिण आफ्रिकेने त्यानंतरही भारताला फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 5 विकेट्स गमावून 260 रन्सपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेकडे यासह 548 धावांची आघाडी झाली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने डाव घोषित केला.
टीम इंडियाकडून 549 धावांचा पाठलाग करण्यासाठी केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल सलामी जोडी मैदानात आली. मात्र सलामी जोडीने निराशा केली. यशस्वीने 13 आणि केएल 6 धावा करुन माघारी परतले. तर दिवसाचा खेळ संपल्यांनतर साई सुदर्शन आणि कुलदीप यादव ही जोडी नाबाद परतली. दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को यान्सेन आणि सायमन हार्मर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
पाचव्या दिवशी टीम इंडिया जिंकणार?
Stumps on Day 4⃣
See you tomorrow for Day 5️⃣ action.
Scorecard ▶️ https://t.co/Hu11cnrocG#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/MXqtMGMhay
— BCCI (@BCCI) November 25, 2025
दरम्यान भारताला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी ऐतिहासिक धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. भारतीय फलंदाजांनी कोलकातील इडन गार्डन्सनंतर गुवाहाटीतही निराशाजनक कामगिरी केली. मात्र क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे. त्यामुळे टीम इंडिया पाचव्या दिवशी चमत्कार करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.