
आयसीसी टी वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी सर्व संघ सराव सामने खेळत आहेत. टीम इंडिया या स्पर्धेआधी एकमेव सराव सामना हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. या सामन्याचं आयोजन हे आज 4 फेब्रुवारीला नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा टीम इंडियाच्या फटकेबाजीचा आनंद घेता येणार आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याने या सामन्यात मोठा बदल केलाय. सूर्याने यासह मुख्य स्पर्धेत मोठ्या बदलाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
सूर्याने या सराव सामन्यात अभिषेक शर्मा याच्यासह इशान किशन सलामीला येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे संजूचा ओपनर म्हणून पत्ता कट करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता संजूला मधल्या फळीत फलंदाजीसाठी यावं लागणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेतील मुख्य सामन्यांतही आता अभिषेक आणि इशान हीच जोडी ओपनिंग करणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
तसेच टीम इंडियाचा मिडल ऑर्डरमधील प्रमुख फलंदाज तिलक वर्मा याचंही दुखापत आणि शस्त्रक्रियेनंतर संघात कमबॅक झालं आहे. तिलकने यूएसए विरूद्धच्या सामन्यातून इंडिया ए साठी कमबॅक केलं होतं. त्यानंतर आता तिलक दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही खेळणार आहे. त्यामुळे आता वर्ल्ड कप स्पर्धेतही तिलक खेळणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. त्यामुळे संजूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार नाही, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
संजूने न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत निराशा केली होती. टीम मॅनेजमेंटने संजूला न्यूझीलंड विरूद्धच्या पाचही सामन्यात संधी दिली होती. मात्र संजू या पाचही सामन्यात सपशेल अपयशी ठरला होता. संजूला फक्त 40 धावाच करता आल्या. तर दुसऱ्या बाजूला इशान किशन याने धमाका केलेला.
इशानने न्यूझीलंड विरुद्ध पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्यात शतक केलं होतं. त्यानंतर संजू सॅमसन याच्याकडे असलेली विकेटकीपिंगची जबाबदारी अचानकपणे इशानला देण्यात आली. तेव्हापासूनच संजूबाबत वर्ल्ड कप स्पर्धेबाबत मोठा निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात पाहायला मिळत होती. त्यानुसार आता संजूला ओपनिंग करण्याची संधी मिळणार नसल्याचं स्पष्ट आहे. आता संजूला यूएसए विरुद्ध टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताच्या पहिल्या सामन्यात संधी मिळणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.