Semi Final: भारताला अंतिम फेरी गाठायची तर इंग्लंडच्या या पाच खेळाडू रोखणं आवश्यक, कोण ते जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपदापासून भारतीय संघ दोन विजय दूर आहे. भारताचा उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना होणार आहे. या सामन्यात भारतासमोर इंग्लंडच्या पाच खेळाडूंचं आव्हान असणार आहे. कोण आहेत हे खेळाडू ते जाणून घ्या.

Semi Final: भारताला अंतिम फेरी गाठायची तर इंग्लंडच्या या पाच खेळाडू रोखणं आवश्यक, कोण ते जाणून घ्या
भारताला अंतिम फेरी गाठायची तर इंग्लंडच्या या पाच खेळाडू रोखणं आवश्यक, कोण ते जाणून घ्या
Image Credit source: Michael Steele/Getty Images
| Updated on: Mar 04, 2026 | 6:28 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतासमोर इंग्लंडचं आव्हान आहे. भारताला अंतिम फेरी गाठायची असेल तर हे कठीण आव्हान काहीही करून पेलावं लागणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या मैदानाचा, खेळपट्टीचा आणि हवामानाचा चांगला अंदाज इंग्लंडच्या खेळाडूंना आहे. त्यामुळे हे आव्हान काही सोपं नाही. भारताला या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर इंग्लंडच्या पाच खेळाडूंना रोखणं गरजेचं आहे. कारण इंग्लंडचे पाच खेळाडू सामना फिरवण्याची ताकद ठेवतात. अशा स्थितीत भारतीय फलंदाज आणि गोलंदाज या दोघांना सावध राहावं लागणार आहे. एका ठिकाणी कमकुवत पडलो तर त्याचा फायदा पाच पैकी एखाद दुसरा खेळाडू आरामात घेऊ शकतो. चला जाणून घेऊयात त्यांच्याबाबत…

हॅरी ब्रूक : इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक सध्या फॉर्मात आहे. त्याने आपल्या फलंदाजीची झलक पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दाखवली. एका बाजूने संघ ढासळला असताना एकहाती सामना खेचून आणला. हॅरी ब्रूकने 51 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकार मारत 100 धावा केल्या होत्या. आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यात त्याने 228 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा 161.70 चा आहे. त्यामुळे हॅरी ब्रूकला झटपट बाद करण्याचं आव्हान असणार आहे.

फिल सॉल्ट : या स्पर्धेत फिल सॉल्टची कामगिरी सातत्यपू्र्ण नाही. पण त्याची बॅट कधीही तळपू शकते. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने आक्रमक फटकेबाजी केली होती, हे विसरून चालणार नाही. त्यात सॉल्टला वानखेडेच्या खेळपट्टीचा अंदाज आहे. या खेळपट्टीवर आयपीएल स्पर्धेत त्याने चांगला घाम गाळला आहे. जर पहिल्या तीन षटकात सॉल्ट टिकला तर त्याला बाद करणं किंवा त्याच्याकडून येणाऱ्या धावा रोखणं कठीण होईल.

विल जॅक्स : मधल्या फळीत विल जॅक्स सामन्याचं चित्र पालटू शकतो. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने हे दाखवून दिलं आहे. त्याने 18 चेंडूत 50 धावा ठोकल्या आणि संघाला विजय मिळवून देण्यात हातभार लावला होता. त्यामुळे इंग्लंडच्या झटपट विकेट पडल्या तरी सामना सहज जिंकू देणार नाही. इतकंच काय तर गोलंदाजीतही कमाल करू शकतो. मधल्या फळीत असलेल्या डावखुऱ्या तिलक वर्मा, शिवम दुबे आणि अक्षर पटेलसाठी डोकेदुखी ठरू शकतो.

जोफ्रा आर्चर : वानखेडेची खेळपट्टीवर हिरवळ असल्याने वेगवान गोलंदाजांना मदत करेल असं बोललं जात आहे. त्यामुळे जोफ्रा आर्चर भारतीय फलंदाजांसाठी त्रासदायक ठरू शकतो. पावरप्लेच्या षटकात वेगवान धावांना ब्रेक लावू शकतो. त्याचा सामना करताना अभिषेक शर्मा आणि इशान किशनला अडचणीचं होऊ शकतं. जोफ्रा आर्चरने या स्पर्धेत आतापर्यंत 10 विकेट घेतल्या आहेत.

आदिल रशीद : भारतीय फलंदाजांची फिरकीविरूद्ध कमकुवत बाजू मागच्या काही वर्षात दिसून आली आहे. 2022 आणि 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत रशीदने भारतासमोर अडचण निर्माण केली आहे. या पर्वातही त्याची गोलंदाजी चांगली चालली आहे. त्याने आतापर्यंत 11 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे त्याचा सामना करताना मधल्या फळीतील फलंदाजांना अडचणीचं जाऊ शकतं.

Follow Us