Mumbai Indians : “सर्वकाही चुकीचं होतंय”, मुंबईच्या कामगिरीवर दिग्गजाची प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाला?
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या 17 व्या मोसमात आपल्या लौकीकाला साजेशी अशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबईच्या या कामगिरीवर दिग्गजाने प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई इंडियन्स, आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी संघांपैकी एक टीम. मुंबईने आतापर्यंत 16 वर्षांमध्ये 5 आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात मुंबईने हा कारनामा केला. मात्र 17 व्या मोसमाआधी मुंबई इंडियन्सचा कर्णधार बदलला. मुंबईला कर्णधार म्हणून 5 वेळा आयपीएल जिंकवणारा रोहित शर्मा याला हटवण्यात आलं. तर गुजरात टायटन्सकडून मुंबईच्या गोटात आलेल्या हार्दिक पंड्या याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. तिथपासून मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी रोहितला कर्णधारपदावरुन हटवण्याच्या निर्णयाचा विरोध केलाय, तो आताही कायम आहे.
मुंबईला हार्दिक पंड्या याच्या कॅप्टन्सीत चमकदार कामगिरी करता आलेली नाही. आयपीएलच्या या 17 व्या मोसमात मुंबईने 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी मुंबईला फक्त 3 सामनेच जिंकता आले आहेत. तर मुंबईला 5 वेळा पराभवाचा सामना करावा लागलाय. मुंबईची झालेली दुर्दशा पाहून दक्षिण आफ्रिकेचा आणि आयपीएलमध्ये आरसीबीसाठी चौफेर फटकेबाजी करणारा माजी फलंदाज एबी डी व्हीलियर्स याने प्रतिक्रिया दिली आहे. एबीने मुंबईच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिलीय. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्ससाठी सर्व चुकीचं होतंय. तसेच आता मुंबईला 6 पैकी 5 सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. मुंबई आयपीएल इतिहासातील सर्वश्रेष्ठ टीम आहे, असं एबीने म्हटलं.
एबी काय म्हणाला?
“असं वाटतंय की हाती काहीच लागत नाहीय. सर्वकाही चुकीचं चाललंय. मात्र ते अजूनही कायम आहेत. त्यांना उर्वरित 6 पैकी 5 सामन्यात विजयाची आवश्यकता आहे. त्यांनी याआधीही असं सर्व केलंय”, असं एबीने म्हटलं.
मुंबई इंडियन्स ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे. मुंबईला 8 मधून 3 सामन्यात विजय मिळवता आलाय. तर 5 वेळा प्रतिस्पर्धी संघांनी पराभूत केलंय. मुंबईच्या नावावर 6 पॉइंट्स आहेत. तसेच मुंबईचा नेट रनरेट हा -0.227 असा आहे.
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पीयुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.