IPL 2026: मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सला नमवलं, पराभवानंतर कर्णधार ऋषभ पंत म्हणाला…

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आमनासामना झाला. मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 229 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान मुंबई इंडियन्सने 4 गडी गमवून पूर्ण केलं.

IPL 2026: मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सला नमवलं, पराभवानंतर कर्णधार ऋषभ पंत म्हणाला...
IPL 2026: मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सला नमवलं, पराभवानंतर कर्णधार ऋषभ पंत म्हणाला...
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 04, 2026 | 11:27 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत झाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 228 धावा केल्या. तसेच विजयासाठी 229 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना मुंबई इंडियन्सने चांगली सुरूवात केली. रोहित शर्मा आणि रिकल्टनने पहिल्या विकेटसाठी 143 धावांची भागीदारी केली. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा विजय सोपा झाला. मुंबई इंडियन्सने 4 गडी गमवून 18.4 षटकात 229 धावांचं लक्ष्य गाठलं. मुंबई इंडियन्सने सलग तीन पराभवानंतर पुन्हा एकदा विजयाची चव चाखली आहे. या स्पर्धेत पाच सामन्यानंतर रोहित शर्माने कमबॅक केलं. कमबॅक सामन्यात त्याने 44 चेंडूत 84 धावांची खेळी केली.

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाल्यानंतर लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने आपलं म्हणणं मांडलं. ऋषभ पंत म्हणाला की, ‘ज्या पद्धतीने आम्ही सुरुवात केली, त्या हिशोबाने आम्हाला अधिक धावा करायला हव्या होत्या. काही चांगल्या गोष्टी दिसून आल्या, मुले मोकळेपणाने खेळली. आम्ही 10-15  धावांनी कमी पडलो. या खेळपट्टीवर 220-230 धावांची गरज होती, पण अशा खेळपट्टीवर तुम्ही गोलंदाजांना दोष देऊ शकत नाही, ते चांगली कामगिरी करत आहेत. आम्हाला थोड्या चांगल्या नशिबाची गरज आहे, मी फक्त एवढंच म्हणू शकतो. खूप साऱ्या आशीर्वादांची मदत होईल, आमच्याकडून नक्कीच अधिक प्रयत्नांची गरज आहे.’

मुंबई इंडियन्सचा या स्पर्धेतील तिसरा विजय आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. त्यानंतर सलग चार सामन्यात पराभूत झाले. गुजरात टायटन्सला पराभूत केलं आणि पुन्हा विजयी ट्रॅक गाठण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर पुन्हा सलग तीन पराभव सहन करावे लागले. आता लखनौ सुपर जायंट्सला नमवून विजयाची चव चाखली आहे. पण मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित मात्र चुकलं आहे. आता उर्वरित चार सामन्यात विजय मिळवला तर मुंबई  इंडियन्सचे 14 गुण होतील. त्यामुळे प्लेऑफचं आव्हान संपलं नसलं तरी जर तर वर अवलंबून आहे.

Follow Us