IPL 2026: एका नियमामुळे गुजरात टायटन्सचं टेन्शन वाढलं, सामना न खेळताच आरसीबीला मिळणार फायनलचं तिकीट
आयपीएल 2026 स्पर्धेत क्वॉलिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्स आणि आरसीबी यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. पण आयपीएलच्या एका नियमामुळे गुजरात टायटन्सचं टेन्शन वाढलं आहे. सामना न खेळताच आरसीबीला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळेल.

IPL 2026 Qualifier 1, RCB vs GT: आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफचे चार संघ ठरले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे प्लेऑफसाठी पात्र ठरले आहे. आयपीएल गुणतालिकेत टॉप 2 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ आहेत. त्यामुळे क्वॉलिफायर 1 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. तर एलिमिनेटर फेरीत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होणार आहे. क्वॉलिफायर 1 सामन्यातील विजेत्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. तर पराभूत झालेल्या संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी एक संधी मिळेल. क्वॉलिफायर 2 मध्ये खेळून अंतिम फेरी गाठता येईल. पण क्वॉलिफायर 1 सामना काही कारणास्तव रद्द झाला तर सामना न खेळताच आरसीबीला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्याला आयपीएलचा एक नियम कारणीभूत आहे.
क्वॉलिफायर 1 सामना रद्द झाला तर अंतिम फेरीत कोण?
आयपीएल स्पर्धेतील साखळी फेरीत एखादा सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण वाटून मिळतो. पंजाब किंग्स आणि केकेआर सामन्यात तसं पाहायला मिळालं. पण प्लेऑफ सामन्यात तसं करता येणार नाही. त्यासाठी बीसीसीआयने वेगळे नियम तयार केले आहेत. जर पावसाचा व्यत्यय आला तर किमान पाच षटकं खेळून सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण पाच षटकांचा खेळही झाला नाही तर सामना रद्द करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. तसेच प्लेऑफच्या सामन्यांसाठी राखीव दिवसही नाही. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. कारण साखळी फेरीत गुणतालिकेत आरसीबीने पहिलं स्थान गाठलं आहे. त्यामुळे या क्वॉलिफायर 1 मध्ये आरसीबीला प्राधान्य दिलं जाईल. तर गुजरात टायटन्स क्वॉलिफायर 2 सामन्यात खेळेल.
आरसीबी की गुजरात! कोण वरचढ?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात कायम तोडीस तोड सामना झाला आहे. आयपीएल स्पर्धेत दोन्ही संघ आतापर्यंत 8 वेळा आमनेसामने आले आहेत. यात दोन्ही संघांनी प्रत्येकी 4-4 सामने जिंकले आहेत. यंदाच्या पर्वातही दोन्ही संघ दोन वेळा भिडले. यात आरसीबीने आणि गुजरात दोघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे चाहत्यांना क्वॉलिफायर 1 मध्ये अतितटीचा सामना पाहायला मिळणार हे नक्की आहे. त्यामुळे अंतिम फेरीत कोण जागा मिळवते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.