IPL 2026 Final, RCB vs GT: अंतिम सामन्यात अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजी की गोलंदाजीसाठी अनुकूल ठरेल?

आयपीएल 2026 स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात खेळपट्टी कशी आहे याबाबत तर्कवितर्क आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर काय निवडावं हे खेळपट्टीवर स्पष्ट होईल. जाणून घेऊयात खेळपट्टीचा अंदाज

IPL 2026 Final, RCB vs GT: अंतिम सामन्यात अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजी की गोलंदाजीसाठी अनुकूल ठरेल?
IPL 2026 Final, RCB vs GT: अंतिम सामन्यात अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजी की गोलंदाजीसाठी अनुकूल ठरेल?
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 30, 2026 | 9:44 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने या स्पर्धेत आपली पकड कायम ठेवली. तर गुजरात टायटन्ससाठी सुरूवात काही चांगली झाली नाही, पण उत्तरार्धात चांगली कामगिरी केली. आता दोन्ही संघ अंतिम सामन्यात भिडणार आहेत. विशेष म्हणजे दोन्ही संघांनी या स्पर्धेच्या इतिहासात एकदा जेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची संधी आहे. आता दुसरं जेतेपद जिंकून कोण इतिहास रचेल याची उत्सुकता आहे. असं असताना अहमदाबादच्या खेळपट्टीचा अंदाज घेणं महत्त्वाचं आहे. ही खेळपट्टी कशी आहे आणि कोणत्या प्लेइंग 11 सह उतरावं याबाबत पुसटशी कल्पना येऊन जाईल.

खेळपट्टी कशी आणि कोणाला मदत करेल?

अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम हे गुजरात टायटन्सचं होमग्राउंड आहे. होमग्राउंड असल्याने प्रेक्षकांची साथ गुजरात टायटन्सला मिळणार यात काही शंका नाही. आयपीएल 2026 स्पर्धेत गुजरात टायटन्सने या मैदानात सात सामने खेळले आणि त्यापैकी पाच सामन्यात विजय मिळवला. दुसरीकडे, आरसीबीची या मैदानावरील आकडेवारी संमिश्र आहे. आरसीबीने या मैदानात एकूण 8 सामने खेळले असून त्यापैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. तर चार वेळा पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. आरसीबी आणि गुजरात टायटन्स या मैदानात दोन वेळा भिडले आहेत. त्यात एक सामना आरसीबीने, तर एक सामना गुजरात टायटन्सने जिंकला आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. अंतिम सामन्यातही तशीच खेळपट्टी असण्याची शक्यता आहे. या खेळपट्टीत काळ्या मातीच्या तुलनेत लाल मातीची मात्रा जास्त असणार आहे. त्यामुळे फलंदाजांना चांगला बाउंस मिळेल आणि फटकेबाजी करता येईल. त्यामुळे हा सर्वोच्च धावसंख्या असलेला सामना ठरू शकतो. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. कारण धावांचा पाठलाग करणं दुसऱ्या डावात सोपं जाणार नाही. त्यात प्रेशर असेल ते वेगळं.

हवामान कसं असेल?

अक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, आयपीएलच्या अंतिम सामन्यात पावसाची शक्यता अजिबात नाही. त्यामुळे हा सामना 40 षटकांचा आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय होईल. दिवसाचं तापमान 41 डिग्री, तर संध्याकाळचं तापमान 30 डिग्रीच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

Follow Us