
देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील एका सामन्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. झारखंड विरुद्ध कर्नाटक सामन्यात धावांचा पाऊस पडला. शतकी खेळी आणि विजयी धावांचा पाठलाग सर्वकाही घडलं. त्यामुळे या सामन्याची चर्चा रंगली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ग्रुप एमधील हा सामना रंगला. झारखंडने प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर रचला होता. 50 षटकात 9 गडी गमवून 412 धावा केल्या आणि विजयासाठी 413 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावसंख्येत इशान किशनचं योगदान होतं. त्याने 125 धावांची खेळी केल्याने एवढ्या धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना झारखंड सहज जिंकेल असा अनुमान सुरुवातीला लावला जात होता. पण हा अंदाज खोटा ठरला. कारण कर्नाटकने हे लक्ष्य 47.3 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. कर्नाटकडून देवदत्त पडिक्कलने 147 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत विजयश्री खेचून आणला.
कर्नाटकने या विजयासह विजय हजारे ट्रॉफी एक विक्रमाची नोंद केली आहे. आतापर्यंतच्या या स्पर्धेतील इतिहासातील सर्वाधिक धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला आहे. या विजयासह कर्नाटकने आंध्र प्रदेशचा 13 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. आंध्र प्रदेशने 2012 मध्ये गोव्याविरुद्ध 384 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता. हे लक्ष्य त्यांनी 48.4 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं होतं. आता हा विक्रम कर्नाटकच्या नावावर झाला आहे. कर्नाटकने झारखंडविरुद्ध 413 धावांचं लक्ष्य गाठलं. यात देवदत्त पडिक्कलची शतकी खेळीसह अभिनव मनोहर आणि ध्रुव प्रभाकरची सहाव्या विकेटसाठी भागीदारी महत्त्वाची ठरली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. अभिनवने 56, तर ध्रुवने 40 धावा केल्या.
वर्ल्ड लिस्ट ए क्रिकेट स्पर्धेतील कर्नाटकची कामगिरी सुवर्ण अक्षरात नोंदवली गेली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात ही दुसरी सर्वात मोठी धावसंख्या गाठली आहे. 2006 मध्ये दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 435 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता. त्याने आता आता कर्नाटकने 413 धावांचा पाठलाग करत या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे.