IND vs PAK : वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाक सामन्यात 15 खेळाडूंचं पदार्पण! कर्णधाराचाही समावेश
IND vs PAK, T20 World Cup 2026 : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील प्रत्येक अपडेटबाबत चाहत्यांमध्ये उत्सूकता आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांचे एकूण 15 खेळाडू पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहेत.

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 23 व्या सामन्यात इंग्लंडने स्कॉटलंडवर मात केली. इंग्लंडने अशाप्रकारे आपल्या मोहिमेतील सलग दुसरा विजय मिळवत आव्हान कायम ठेवलं. स्पर्धेत आतापर्यंत 23 सामने खेळवयात आले आहेत. मात्र त्यानंतर अजूनही सुपर 8 मध्ये एकाही संघाचा प्रवेश निश्चित झालेला नाही. दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात स्पर्धेतील 24 वा सामना होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये धडक देईल. एका बाजूला आता सुपर 8 साठी चुरस पाहायला मिळतेय. तर दुसऱ्या बाजूला चाहत्यांची भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी उत्सूकता शिगेला पोहचली आहे.
भारत-पाकिस्तान सामना
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा 15 फेब्रुवारीला कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील तिसरा सामना असणार आहे. भारत आणि पाकिस्तानने आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे रविवारी होणारा सामना जिंकून कोणता संघ थेट सुपर 8 मध्ये धडक देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारताने जबरदस्त कामगिरी केलीय. तर पाकिस्तानही ठिकठाक कामगिरी करत इथवर पोहचलाय. सलमान अली आगा याने त्याच्या नेतृत्वात पाकिस्तानला अजिंक्य ठेवलंय. त्यामुळे हायव्होल्टेज सामन्यात चाहत्यांना चुरस पाहायला मिळणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील हा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 15 खेळाडूंसाठी खास ठरणार आहे.
प्रत्येक खेळाडूचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचं स्वप्न असतं. त्यानंतर कारकीर्दीत एकदातरी वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची संधी मिळावी हे खेळाडूचं ध्येय असतं. काही खेळाडूंची ध्येयपूर्ती होते तर काहींची नाही. हीच बाब भारत-पाकिस्तान सामन्याबाबतही लागू पडते. भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात खेळाडूंना चमकदार कामगिरी करुन क्रिकेट विश्वात आपली छाप सोडण्याची संधी असते.
आता रविवार 15 फेब्रुवारी हा दिवस दोन्ही संघांच्या एकूण 15 खेळाडूंसाठी अविस्मरणीय असा ठरणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांतील 15 खेळाडूंना संधी मिळाल्यास त्यांचा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील एकमेकांविरूद्धचा पहिलाच सामना ठरणार आहे.
टीम इंडियाचे किती खेळाडू?
टीम इंडियाकडून आतापर्यंत अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकु सिंह, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन आणि कुलदीप यादव हे खेळाडू पाकिस्तान विरुद्ध खेळले आहेत. मात्र ते टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध खेळले नाहीत. त्यामुळे या खेळाडूंना संधी मिळाल्यास रविवारी त्यांचं वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध पदार्पण होईल.
तसेच पाकिस्तानकडून उस्मान तारिक, सलमान मिर्जा, अब्रार अहमद, कर्णधार सलमान अली आगा, फहीम अश्रफ, ख्वाजा नफे, साहिबजादा फरहान आणि सॅम अय्यूब हे टीम इंडिया विरुद्ध टी 20I वर्ल्ड स्पर्धेत खेळले नाहीत.
