IPL 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हे दोन संघ भिडणार! माजी क्रिकेटपटूने वर्तवलं असं भाकीत

आयपीएल 2025 स्पर्धेतील प्लेऑफमधील चार संघ ठरले आहेत. आता या चार संघांपैकी एका संघाकडे जेतेपद असेल यात काही शंका नाही. पण अंतिम फेरीत कोणते संघ भिडणार याबाबत आतापासूनच भाकीत वर्तवलं जात आहे. माजी क्रिकेटपटून रॉबिन उथप्पा याने याबाबत भविष्यवाणी केली आहे.

IPL 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हे दोन संघ भिडणार! माजी क्रिकेटपटूने वर्तवलं असं भाकीत
आयपीएल 2025 ट्रॉफी
Image Credit source: Pankaj Nangia/Getty Images
| Updated on: May 27, 2025 | 4:12 PM

आयपीएल 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. पण या सामन्याचा प्लेऑफमध्ये पात्र संघांवर काहीच परिणाम होणार नाही. पण टॉप 2 गणित तेवढं काय ते सुटणार आहे. पण हे गणितच खूप महत्त्वाचं आहे. कारण टॉप 2 मध्ये असलेल्या संघांना क्वॉलिफायर 1 सामना जिंकताच थेट फायनलला खेळण्याची संधी मिळते. तसेच पराभव झाला तरी क्वॉलिफाय 2 मधून अंतिम फेरीची आणखी एक संधी मिळते. त्यामुळे टॉप 2 मध्ये राहणं किती महत्त्वाचं आहे यावरून कळतं. पंजाब किंग्सने टॉप 2 मध्ये जागा मिळवली आहे. तर मुंबई इंडियन्स एलिमिनेटर सामना खेळणार हे पक्कं झालं आहे. म्हणजेच आता गुजरात टायटन्स आणि आरसीबी यांच्यातच टॉप 2 मधील एका जागेसाठी चुरस आहे. आरसीबीने लखनौविरुद्धचा सामना जिंकला तर टॉप 2 मध्ये जाईल. पण गमावला तर मुंबई इंडियन्स विरुद्ध एलिमिनेटर फेरीत खेळावं लागेल. असं असताना अंतिम फेरीतील दोन संघांबाबत माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याने भाकीत वर्तवलं आहे.

रॉबिन उथप्पाने जियोस्टारशी बोलताना सांगितलं की, ‘पंजाब किंग्सने जबरदस्त कामगिरी करत प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे. पंजाब किंग्सची फलंदाजी खूपच जबरदस्त आहे. अर्शदीप सिंग चांगली गोलंदाजी करत आहे. यामुळे थेट संकेत मिळतात की मोठ्या सामन्यात तो चांगली कामगिरी करेल. मला पूर्ण विश्वास आहे की, आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आरसीबी आणि पंजाब किंग्स हे संघ भिडतील.’ त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स विरुद्धचा सामना जिंकणं आरसीबीसाठी खूपच महत्त्वाचं आहे. कारण तसं झालं तर हे दोन संघ अंतिम फेरीसाठी थेट आणि दोन संधी उपलब्ध असतील. जर हे दोन संघ अंतिम फेरीत आले तर आयपीएल इतिहासात नवा विजेता मिळेल. कारण या दोन्ही संघांनी जेतेपद मिळवलेलं नाही.

आरसीबी फ्रेंचायझीचं कौतुक करताना रॉबिन उथप्पाने सांगितलं की, ‘जोश हेझलवूड परत आल्याने मी खूप खूश आहे. त्याच्या येण्याने संघ खूपच मजबूत होईल. हेझलवूडने गोलंदाजीचा सराव सुरु केला आहे. तर विराट कोहलीला चेस मास्टरची भूमिका बजवावी लागणार आहे. त्याला 20 षटकापर्यंत फलंदाजी करणं आवश्यक आहे. जर त्याने तसं केलं तर समोरचा संघ दबावात येईल.’